पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या येथे २२ जानेवारीला श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या महोत्सवाचे प्रमुख अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वा देशात सांस्कृतिक पुनरुज्जीवन होत आहे. परमेश्वराने या विशेष कार्यासाठी मोदींना पाठवले आहे, असे प्रतिपादन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी केले आहे. (Ram Mandir Pran Pratishtha)
कामेश्वर चौपाल राम जन्मभूमी आंदोलनातील एक प्रमुख नाव आहे. ९ नोव्हेंबर १९८९ला राम मंदिराचे शिलान्यास करणारे ते पहिले कारसेवक होते. चौपाल यांनी या आंदोलनाला उजाळा दिला. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींना परमेश्वराने एका विशिष्ट कारणासाठी नियोजित केले आहे, असे वाटते. याच कारणासाठी त्यांचा जन्म झाला आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या लहानपणापासूनच अध्यात्मिक आहेत," असे ते म्हणाले.
चौपाल म्हणाले, "मोदी फार पूर्वीपासून भारतीय संस्कृती आणि मूल्यं यांच्यावर काम करत आहेत. जेव्हा लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली जी रथयात्रा काढण्यात आली त्याचे सारथी नरेंद्र मोदी होते." हा यात्रा सोमनाथ ते अयोध्या अशी काढण्यात आली होती, या यात्रेने १० हजार किलोमीटरचा प्रवास केला होता.
चौपाल म्हणाले, "ब्रिटिश राजवटीतही राम जन्मभूमीसाठी संघर्ष झाला. स्वातंत्र्यानंतर यासाठी रक्त सांडले. निशस्त्र कारसेवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि लाठीमार झाले. रस्त्यावर आणि संसदेत असा दोन्हीकडे राम जन्मभूमीसाठी संघर्ष झाला."
"आता प्राणप्रतिष्ठा होत आहे, हा क्षण अवर्णनीय आहे. हे स्वप्न ज्यांनी पाहिले, अनेकांच्या पिढ्यांनी यात बलिदान दिले, त्यांच्यासाठी हा फार मोठा क्षण आहे. प्राणप्रतिष्ठा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा येथे मूर्ती प्रकट झाली, आणि त्यानंतर संघर्ष झाला. दीर्घ लढ्यानंतर प्रभू रामचंद्रांना त्यांची जन्मभूमी मिळाली आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे," असे ते म्हणाले.
हेही वाचा