अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्णच; नृपेंद्र मिश्रा यांची स्पष्टोक्ती

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्णच; नृपेंद्र मिश्रा यांची स्पष्टोक्ती
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कथित अपूर्णत्वाच्या मुद्द्यावरून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्रा पुढे सरसावले आहेत. गर्भगृह आणि राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंदिर पूर्ण झाल्यानंतरच प्राणप्रतिष्ठा करावी, असा हिंदू धार्मिक विधींमध्ये नियम नाही, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केला.

श्रीराम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसताना राजकीय लाभासाठीच 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा घेण्यात येत असल्याचा मुद्दा धार्मिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आला आहे. यावर मिश्रा म्हणाले, श्री रामलल्लाच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. श्री रामलल्लाच्या मंदिरात गर्भगृह आणि पाच मंडप आहेत. हा भाग मंदिराचा तळमजला असून, तो आधीच पूर्ण झाला आहे. सध्या पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. हा पहिला मजला श्रीराम दरबाराचा आहे. त्यात सीता, लक्ष्मण, हनुमान यांची स्थाने आहेत. दुसरा मजला यज्ञयाग आणि इतर धार्मिक अनुष्ठानांसाठी असेल. त्यामुळे श्री रामलल्लाचे मंदिर पूर्ण झाले आहे. जुन्या काळातील मंदिरांचे निर्माणकार्य पन्नास वर्षांपर्यंत चालत होते. याचा अर्थ असा नव्हे की, त्यात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली नाही किंवा पूजाअर्चा झाली नाही. हा वस्तुस्थिती योग्यप्रकारे समजून न घेण्याचा प्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात याचिका

दरम्यान, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबविण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात बुधवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. गाझियाबाद येथील भोलादास यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, देशातील शंकाराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी आक्षेप घेतला आहे.

सोरटी सोमनाथ मंदिराचा दाखला

'विहिंप'चे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनीही श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळीही गाभार्‍याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तळमजल्यावर होणार आहे. तो पूर्ण झाला आहे. हिंदू धार्मिक विधींमध्ये मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी, असा कोणताही नियम नाही. भव्य मंदिरांच्या निर्माणकार्याला प्रदीर्घ कालावधी लागतो, तेव्हा गर्भगृह पूर्ण झाल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पंडित नेहरू पंतप्रधान असताना तत्कालीन मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही मंदिराचे गर्भगृह पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता. आरोप करणार्‍यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी, असा चिमटाही अलोक कुमार यांनी काढला..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news