मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकण्यात आल्याचे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्रे असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरे कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही", असे फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी (दि.5) जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या दोघा कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. या घटनेने संमेलनस्थळी एकच धावपळ उडाली. पोलिसांनी या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
साहित्य संमेलनाच्या एका सत्रासाठी उपस्थित राहण्यासाठी कुबेर हे संमेलनस्थळी आले. यावेळी कुबेर यांनी गोल्फकार्टमधून संमेलन स्थळाची पाहणी केली. कुबेर यांच्यासोबत यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. याचवेळी पुण्याहून आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या दोघा कार्यकर्त्यांनी कुबेर यांच्यावर शाइफेक केली. त्यावेळी पंकज भुजबळ यांनी त्या दोघांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेनंतर संमेलनस्थळी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.