पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतविषयक धोरण समितीने (MPC) सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२४- २५ साठी ७ टक्के वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज बांधला आहे. "जोखीम समान रीतीने संतुलित आहेत," असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी म्हटले आहे. (RBI MPC Meeting 2024)
२०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीसाठी वास्तविक जीडीपी आता ७.२ टक्क्यांवर अपेक्षित आहे. जो डिसेंबरमधील मागील घोषणेवेळी ६.७ टक्के होता. गव्हर्नर दास यांनी सांगितले की, २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ ६.८ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आरबीआयने अन्नधान्याच्या किमती वाढण्याची चिंता आणि कच्च्या तेलाच्या किमतीबाबत अनिश्चितता असूनही आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाईवाढीचा अंदाज ५.४ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतविषयक धोरण समितीने (MPC) सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय आज गुरुवारी (दि. ८) आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी जाहीर केला. (RBI monetary policy) आरबीआयच्या सहा सदस्यीय पतविषयक धोरण समितीने ५ विरुद्ध १ असा बहुमताने रेपो रेट ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दास यांनी सांगितले.
जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती संमिश्र आहे. जागतिक स्तरावर सॉफ्ट लँडिंगची शक्यता वाढली आहे. नवीन फ्लॅश पॉइंट्सच्या उदयामुळे जागतिक मॅक्रो दृष्टीकोनामध्ये अनिश्चितता येते. RBI चे योगदान जागतिक स्तरावर ओळखले जात आहे, असे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.