पुढारी ऑनलाईन डेस्क: रेमंड (Raymond) लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. दिग्गज उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून या संदर्भात माहिती दिली आहे. 'मुलांसाठी जे चांगले, ते आम्ही करत राहू' असे म्हणत त्यांनी लग्नाच्या ३२ वर्षानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे सांगितले आहे. (Gautam Singhania)
कापडापासून ते रिअल इस्टेटपर्यंतच्या क्षेत्रात कार्यरत असलेला रेमंड (Raymond) हा देशातील माेठ्या उद्याेग समुहापैकी एक आहे. या समुहाचे मालक गौतम सिंघानिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यंदाची दिवाळी पूर्वीसारखी असणार नाही. नवाज आणि मी इथून पुढे वेगळे मार्ग अवलंबणार आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होत आहे. निहारिका आणि न्यासा या आमच्या दोन मौल्यवान हिऱ्यांसाठी आम्ही जे सर्वोत्तम आहे ते करत राहिन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Gautam Singhania)
त्यांनी पुढे लिहले आहे की, एक जोडपे म्हणून मागील ३२ वर्षे आम्ही एकत्र राहिलो. पालक म्हणून वाढलो आणि नेहमीच एकमेकांची ताकद बनलो. या काळात आम्ही वचनबद्धता, दृढनिश्चय आणि विश्वासाने एकत्र आम्ही आमचे आयुष्य जगलो तसेच आयुष्याच्या एका टप्प्यावर आलो आहे. मी तिच्यापासून विभक्त होत आहे, परंतु आमच्या दोन मौल्यवान हिऱ्यांसाठीजे चांगले आहे ते आम्ही करत राहू. कृपया या आमच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर करा. तसेच आम्हाला संबंधातील गोष्टी सोडवण्यासाठी संधी द्या. यावेळी मला तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभेच्छा पाहिजे आहेत, असेही उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विभक्त होण्याची घोषणा करण्याच्या काही मिनिटांपूर्वी, गौतम सिंघानिया यांनी X वर लिहिले होते की, त्यांच्या रेमंड समूहाची रिअल इस्टेट शाखा संपूर्ण मुंबईत आपली उपस्थिती वाढवत आहे. आम्ही मुंबई शहरात ५००० कोटीच्या (USD 678 दशलक्ष) एकत्रित कमाई क्षमतेसह ३ नवीन रिअल इस्टेट प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या काही प्रकल्पांमध्ये आमच्या रियल्टी व्यवसायात जोरदार वाढ झाली आहे आणि आम्ही उत्सुक आहोत. आगामी रेमंड ग्रुपशी संबंधित प्रकल्पांना उच्च दर्जाची गुणवत्ता प्रदान करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
उद्योगपती गौतम सिंघानिया हे काही वर्षांपूर्वी वडील विजयपत यांच्याशी झालेल्या भांडणामुळे प्रसिद्धीझोतात आले होते. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड ग्रुपची स्थापना केली. त्यांनी परिधान ब्रँड आणि कापडांचे उत्पादन करून भारतातील घराघरात रेमंड हे नाव पोहचवले. त्यांचा मुलगा गौतम याने कमाई वाढवण्याच्या उद्देशाने समूहातील अधिक क्षेत्रांमध्ये विविधता आणली. गौतम सिंघानिया यांचे वडील प्रसिद्ध विमानचालक होते, ते विनामूल्य व्यावसायिक विमान उडवत होते. त्यांच्याप्रमाणेच गौतम सिंघानियाही हे देखील धाडसी कृतींसाठी ओळखले जात होते. ते जगभरातील सर्किट्समध्ये वेगवान कार रेसिंगसाठी देखील ओळखले जातात.