![युक्रेमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आपत्तकालीन बैठकीत घेण्यात आली.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2FRussia-Ukraine-Crisis-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्याच्या प्रयत्नांना वेग येण्यासाठी आता चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारच्या देशांध्ये जाणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि व्ही. के. सिंग यांचा समावेश आहे. हा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्तकालीन बैठकीत घेण्यात आला.
रशिया -युक्रेन युध्दाचा आज पाचवा दिवस आहे. रशियाने अधिक आक्रमक होत युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत.यामुळे या देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन आज सकाळी आपत्तकालीन बेठक घेतली. वृत्तसंस्था 'एएनआय'ने केलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि व्ही. के. सिंग यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाणार आहे. हे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यासाठी संबंधित देशांबरोबर चर्चा करतील.
युक्रेनमध्ये अडकलेल्या २४९ भारतीय विद्यार्थी हवाई मार्ग आज मायदेशी परतले. सकाळी दिल्ली विमानतळावर साडेसहा वाजता हे विद्यार्थी आले. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेले ११०० हून अधिक विद्यार्थी भारतात परतले आहेत. त्यांना रोमानिया मार्गे देशात परत आणण्यात आले आहे.
नागरिक व विद्यार्थी असे एकुण १८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दिली. सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. अजून १८ हजार भारतीय नागरिक व विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय दुतावास सर्वांना सुखरप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय दुतावासाने सर्व विद्यार्थ्यांना युक्रेनच्या पश्चिम भागात जाण्याचे आवाहन केले आहे.
शनिवारी रात्री उत्तर प्रदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन युक्रेन-रशिया युद्धाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. बैठकीच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्रालयाकडून सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी कोणकोणते उपाय केले जात आहेत, याची माहिती याद्वारे देण्यात आली हाेती.
हेही वाचलं का?