पुढारी ऑनलाईन डेस्क : ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील चौथा सामना पावसामुळे वाहून गेला नसता तर इंग्लंडला मालिका 3-2 ने जिंकता आली असती.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघ 384 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 334 धावांवर गारद झाला. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी 140 धावांची भागीदारी करून कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली, मात्र चेंडू बदलल्याने ऑस्ट्रेलियाचे नशीब पालटले. 28 धावांच्या आत वॉर्नर, ख्वाजा आणि लबुशेनच्या रूपाने इंग्लंडला तीन यश मिळाले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीने 95 धावांची भागीदारी करत संघाला सांभाळले, पण पावसाने दोघांचीही लय बिघडवली.
उपाहारानंतरचे सत्र पावसाने वाहून गेले आणि त्यानंतर मोईन अलीने ट्रॅव्हिस हेडला बाद करून ही भागीदारी तोडली. ही भागीदारी तुटताच इंग्लंडने सामन्यावरची आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. कांगारूंना चौथा धक्का 264 धावांवर बसला. इंग्लिश संघाने पुढील 70 धावांत ऑस्ट्रेलियाला गुंडाळले. यादरम्यान ख्रिस वोक्सने 4, तर मोईन अलीने 3 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी शेवटची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडलाही दोन बळी मिळाले. अॅलेक्स कॅरीला बाद करून त्याने आपली शानदार निरोप घेतला.