Bumrah New Captain : बुमराह भारताचा नवा कर्णधार! आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा | पुढारी

Bumrah New Captain : बुमराह भारताचा नवा कर्णधार! आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bumrah New Captain : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने सोमवारी, 21 जुलै रोजी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे (jasprit bumrah) सोपवण्यात आले आहे. बुमराह जवळपास 10 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे आणि तो येताच त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराह अखेर पूर्ण तंदुरुस्त होऊन टीम इंडियात परतला आहे. आयर्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत तो भारतीय संघाचा कर्णधार असेल. यासोबतच वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानेही दीर्घकाळ दुखापतीनंतर तीन सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर बुमराह एकही सामना खेळला नाही. तो गेल्या काही महिन्यांपासून बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे फिटनेसवर काम करत होता. त्याला न्यूझीलंडमध्ये पाठीची दुखापत झाली होती. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने काही सराव सामनेही खेळले. या दौऱ्यावर लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याचीही शक्यता आहे.

या दौऱ्यातून नियमित कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

बुमराहने (jasprit bumrah) सप्टेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. पाठीच्या सततच्या दुखापतीमुळे हैराण झालेला बुमराह आता शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत आहे. आयर्लंडविरुद्धची ही मालिका त्यांच्या आशिया चषक आणि विश्वचषकाचे भवितव्य ठरवेल.

टीम इंडियाला ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करत या दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघात बहुतांश युवा खेळाडूंना स्थान दिले आहे. भारतीय संघाला पाच दिवसांत आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने (18, 20 आणि 23 ऑगस्ट) खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने डब्लिनमध्ये होणार आहेत.

जैस्वाल आणि रिंकू सिंहचा संघात समावेश

युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनाही या मालिकेसाठी संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही अष्टपैलू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. या संघातील काही खेळाडूंची नावे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातही समाविष्ट आहेत. पण हे खेळाडू त्या स्पर्धेपूर्वीच आयर्लंडमध्ये पदार्पण करू शकतात.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

Back to top button