पुढारी ऑनलाईन : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना आज बुधवारी समन्स बजावले. कीर्तिकर यांना मुंबई- वायव्य येथून ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. याच दरम्यान त्यांना ईडीचे समन्स आले आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ईडीच्या कारवाईवरून ठाकरे गटाचे खासदार संजय यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे दिल्लीत केजरीवाल यांच्याबाबतीत झाले तेच महाराष्ट्रातील नेत्यांच्याबाबत होत आहे. अमोल कीर्तिकर हेच मुंबई- वायव्य येथून ठाकरे गटाचे उमेदवार असतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. ५२ कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. (Khichdi scam)
खिचडी घोटाळाप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर, ठाकरे सेनेचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर, ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची चाैकशी केली आहे.
कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आधीच ठाकरे गटाच्या काही नेत्यांची चौकशी झाली आहे. आता खिचडी घोटाळ्यामुळे ठाकरे गटातील काही नेते अडचणीत आले आहेत. आता अमोल कीर्तिकरांची ईडी चौकशी करत आहे.
हे ही वाचा :