कोल्हापूर म्हंटलं की तावडे हॉटेलच्या कमानीपासूनचा प्रवास पंचगंगेच्या काठावर येऊन थांबतो. कोल्हापुरातील प्रत्येक माणूस हा आपल्या रांगड्या स्वभावामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखला जातो. (Kolhapuri People)
तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी पायतान आणि अंबाबाईचे महाद्वार ही कोल्हापूरची खासीयत. दूध कट्टा, फुटबॉल, मटण, म्हैशींची शर्यत यासह अन्य विषयांवर कोल्हापूरमध्ये राहून गेलेले लोक कोल्हापूरच्या प्रेमापोटी लिहित असतात.
दरम्यान, कोल्हापूच्या मातीशी नाते जपलेले ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी कोल्हापूर विषयी फेसबुकवर लिहिले आहे.
माझं निरीक्षणं असं–
१. कोल्हापुरात सुबत्तेची संस्कृती आहे. कोणाकडेही जेवायला गेलात तर मटण मस्त. मटण रस्सा, मटण लोणचं आणि मटण बिर्यानी. ताटात चिकन असेल तर अपमान समजला जातो.
२. कोल्हापुरातले लोक्स कोणताही विषय कोल्हापूर शहर वा जिल्ह्यात आणतात. आपल्या शहरावर त्यांचं निस्सीम प्रेम आहे.
नागपूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, मुंबई कोणत्याही शहरात ही बाब अनुभवाला येत नाही.
३. कोल्हापुरातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इतकी वाईट होती की अनेकदा डॉक्टर बिसलरीचं पाणी प्या अशी शिफारस करायचे. पंचगंगेचं पाणी कोल्हापूरकरांनी एवढं प्रदूषित केलं आहे.
४. गणेशोत्सव मंडळांसारखी कोल्हापुरात रस्सा मंडळं असतात. मटणाचा रस्सा बनवायचा आणि सर्वांनी पोळ्या घेऊन यायचं. आणि मटणाचा एकत्रित आस्वाद घ्यायचा. हे फक्त कोल्हापुरातच मी पाहिलं.
५. म्हशींची शर्यत कोल्हापुरातच पहायला मिळते.
६. कोल्हापुरात फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे.
७. कोल्हापूरात समूहजीवनाला प्रधान स्थान आहे. कट्टा संस्कृती केवळ कोल्हापुरात आहे.
एका कट्ट्यावरचे तरुण एकसारखी केशभूषा वा वेशभूषा करतात. वा आपण या कट्ट्याचे आहोत याची खूण देहावर बाळगतात.
८. मराठी साहित्यात पुण्यातील सदाशिव पेठ भरपूर आहे परंतु कोल्हापुरातील शिवाजी पेठ नाही.
शिवाजी पे0ठेतल्या लोकांनी साहित्य लिहिलं तर कोल्हापूरकरांबद्दलचे अनेक समज वा गैरसमज यांना धक्का लागेल.
९. मुंबईनंतर मला आवडणारी महाराष्ट्रातली शहरं म्हणजे कोल्हापूर आणि नागपूर.