दिवाळी म्हंटलं की… दिवे, आकाशकंदील, समई, पणती आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे फटाके समोर दिसतात. यातून आनंदाचा, उत्साहाचा प्रकाश सर्व ठिकाणी पसरतो. फटक्यांमधून निघणारा कारंजासारखा अग्नी आकर्षक आणि मोहक वाटतो. या अग्नीबद्दल बोलताना प्रसिद्ध इतिहासकार जॅक केल्ली म्हणतो की, "अग्नी हा पवित्र, दाहक आणि भयंकरच नाही तर तो मनोरंजकही आहे." त्यामुळे फटाक्यांची ही रात्र सर्वांना मंत्रमुग्धदेखील करते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
भारतात फटक्यांचा वापर कधी करण्यात आला असावा बरं? त्या संदर्भात इतिहासकार पी. के. गोडे यांच्या १९५० मध्ये प्रकाशित झालेल्या 'हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन बिट्वीन 1400 ते 1900' या पुस्तकात असं म्हंटलंय की, भारतात दिवाळीच्या सणाला फटाक्यांचा वापर सामान्य असला तरी, इ.स. १४ शतकात फटाक्यांचा वापर करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. कारण, त्याचवेळी भारतीय युद्धांमध्ये दारू (बारुद) वापरण्यास सुरूवात झाली होती.
चीनमध्ये सर्वप्रथम फटाक्यातील दारूचा (गन पावडर) शोध लागला. तेव्हा त्याला 'डेव्हिल्स डिस्टिलेट' या नावाने ओळखले गेले. हा शोध सर्वांनाच धक्कादायक असला तरी त्यांना नव्या अविष्काराचा आनंदही होता. सुरुवातीला लष्करी वापरासाठी त्याचा फटक्यांचा वापर करण्यात आला. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही (पायरोटेक्निकल शो) त्याचा वापर वाढला. ही कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणारी गन पावडर चीन आणि अरब देशांतून भारत आणि युरोपमध्ये पहिल्यांदा पाठविण्यात आली.
भारतात १४४३ मध्ये विजयनगरचा राजा दुसरा देवराया याच्या दरबारात महानवमी सणाच्या निमित्ताने फटाक्यांचा वापर हा करण्यात आला, अब्दर रज्जाक यांनी नमूद करून ठेवलं आहे. याच काळातील इटालियन प्रवासी लुडोव्हिको दी वर्थेमा यांनी विजयनगरमधील हत्तीसंदर्भात लिहून ठेवलं आहे की, "हत्तींना फटाक्यांची भीती वाटते. फटाके वापरले गेले तर उधळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणणं खूप अवघड होऊन जाईल."
मध्ययुगीन भारतात सण-समारंभामध्ये विशेष करून लग्नांमध्ये आतषबाजी किंवा फटाक्यांच्या शोंचे आयोजन केले जात होते. तो मनोरंजनाचा प्रकार होता. आतिषबाजीसाठी लागणारे मिश्रण किंवा फटाके तयार करण्याचे तंत्र 'कौतुकचिंतामणी' या ग्रंथामध्ये आढळतात. ओरिसातील प्रतिष्ठित लेखक गजपती प्रताप रुद्रदेव यांनी म्हंटलंय की, इ.स १४०० मध्ये चीनमधून पायकोटेक्निकचे सूत्र भारतात आणलं गेलं.
इतिहासकार सतीश चंद्रा हे आपल्या 'मध्ययुगीन भारत : मुघलांची सल्तनत' या पुस्तकात अशी नोंद करतात की, इ.स १६०९ मध्ये विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिल शहा याने आपल्या मुलीच्या लग्नात फटक्यांसाठी ८० हजार रुपये खर्च केले होते. भारतात असे आतषबाजीचे किंवा फटक्यांच्या शोचे आयोजन पूर्वीपासून करण्यात येत होते. भारतातील पोर्तुगिज अधिकारी दुओर्टे बार्बोसा यांना लिहून दिले की, "गुजरातमधून प्रवास करताना एका ब्राह्मण फॅमिलीमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात राॅकेट, फटाके आणि आतषबाजी लावण्यात आलेले होते. गुजरातमध्ये त्यावेळी फटक्यांचे प्रमाण जास्त होते."
पौराणिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये फटाक्यांचा उल्लेख आढळतो. संत एकनाथ महाराजांच्या 'रुक्मिणी स्वयंवर' या ग्रंथात रुक्मिणीचं आणि कृष्णाच्या लग्नाचे वर्णन आहे. त्यामध्ये राॅकेट, फुलझडी, फटाक्यांचा सविस्तर वर्णन केलेले आढळते. १८ व्या शतकापासून दिवाळी मनोरंजनांच्या उद्देशातून फटाक्यांच्या वापरांची खरी सुरुवात झाली. 'पेशव्यांची बखर'मध्ये उल्लेख आहे की, कोटाह (कोटा, राजस्थान) दिवाळी साजरी करण्यात येत होती. त्यावेळी महादजी सिंधिया पेशवे सवाई माधवराव यांना दिवाळीसंदर्भात सांगतात की, "कोटामध्ये दिवाली ४ दिवसांची साजरी केली जाते. तेव्हा लाखो दिवे लावले जातात… असे सविस्तर वर्णन पेशव्यांना सांगितले. सिंधिया यांचं वर्णन ऐकून पेशव्यांनीही दिवाळी आपल्या इकडे फटाके आणि आतिबाजीचे आदेश दिले.
१७९० मध्ये रायबहादूर डी. बी. पारसनीस यांनी फटाक्यांच्या संदर्भातील भाषांतरीत काही वृत्तांत लिहिले. हे वृत्तांत त्यांनी कलकत्त्यातील इंग्रजांना आणि औधचे नवाब असफ-उद-दौल्लाह यांच्याकडे पाठवले. त्यात त्यांना फटक्यांचं वर्णन केलेलं आहे. रायबहादूर वर्णन केलं आहे की, फटक्यांपासून तयार केलेले राॅकेट, फुलबाजे, मासे, साप यांचे आकर्षक वर्णन केले आहे. हे फटाके आकाशात फुटतात तेव्हा ते नेत्रदीपक असतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
पेशवाई संपत चालली होती, मुघल साम्राजही अखेरचा श्वास घेत होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व वाढत चाललं होतं तेव्हा त्यांना फटक्यांसंदर्भात काहीच माहिती नव्हती. पण, दिवाळीतील आतिषबाजीबद्दल माहिती होती. त्यावेळी गनपावडरचे निर्मातेच फटाक्यांची निर्मिती करत होते. त्याचा कच्चा माल भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्याचा युद्धातही वापर जास्त होत होता. नंतरच्या कालावधीत डायनामाईटचा वापर लष्कारात होऊ लागला. त्यामुळे गनपावडर मागे पडली. नंतर मध्ययुगीन तंत्रज्ञान पुढे आले. १९ व्या शतकात पहिल्यांदा भारतात कोलकाता येथे फटाक्याचा कारखान सुरू करण्यात आला. नंतरच्या काळात तामिळनाडू फटकेनिर्मितीमध्ये आघाडीचे ठिकाण म्हणून पुढे आले.
पहा व्हिडीओ : अभिनयाबरोबरच प्रार्थना बेहरेची अनोखी कलाकारी