![Diary Writing Benefits: दररोज डायरी लिहा, तणावमुक्त रहा..! ‘हे’ आहेत डायरी लिहिण्याचे आश्चर्यकारक फायदे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2Fdiary-writing.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: तुम्ही देखील तुमच्या लहानपणी डायरी (रोजनिशी) लिहून ती उशाखाली ठेवली असेल. तुमचे दैनंदिन काम, मनातील भीती, भावना व्यक्त करण्याची जागा म्हणजे पूर्वी डायरी (रोजनिशी) असायची. तुमच्या मनातील विचार आणि भावना काढून टाकून पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची प्रेरणा ही डायरी (Diary Writing Benefits) तुम्हाला देत होती. यामुळे तुमच्या विचारात आणि कृतीत स्पष्टता येऊन, हे जग सुद्धा तुम्हालाही स्पष्टपणे दिसायला मदत झालीच असणार.
पण जसजसे आपण मोठे होत गेलो. काम, जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि आपली डायरी (Diary Writing Benefits) लिहिणे बंदच झाले. यामुळे आपलं व्यक्त होणं बंद झालं. याचा परिणाम म्हणजे अनेकांना तणाव, नैराश्य आणि चिंता यांसारख्य़ा मानसिक आजारांचा सामना करण्याची वेळ आली आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का, की दररोज डायरी लिहिणे हे मानसिक आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे. रोज डायरी लिहल्याने आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता येते पण मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते.
समर्थ रामदास स्वामीही आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये "दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे' असा उपदेश केला आहे. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहिल्याने आपल्याला आपल्या जगण्याचे आकलन होते, असे अनेक संशोधानातून समोर आले आहे. डायरी लिहणे (Diary Writing Benefits) हा कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा समुपदेशन न घेता, मानसिक आजार आणि ताणतणावावर मात करण्याचा एक सोपा उपाय असल्याचेही एका संशोधनात म्हटले आहे.
चिंता ही चितेसमान असते, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे चिंता करण्याने मानवी शरीरावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. सातत्याने चिंता केल्याने भीती, अस्वस्थता, तणाव निर्माण होणे, हदयाचे ठोके वाढणे यासारख्या भावना जाणवतात. सतत चिंता करणार्यांना गंभीर शारीरिक आणि मानसिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. या समस्येवर मात करण्यासाठी नियमित डायरी लिहिणे फायद्याचे ठरते. डायरी लिहिल्यामुळे मनातील भावना कमी होऊन, चिंतेची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
मनातील भावना आणि डोक्यातील विचार कागदावर उतरवून काढण्याने मानसिक ताण दूर होण्यास मदत होते. मनातील दु:ख, नातेसंबंधातील निराशा, मनातील तीव्र भावनांमुळे येणारा ताणतणाव डायरीत लिहल्यामुळे मन रितं रितं होतं. डायरी लिहल्यामुळे दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून लांब रहाण्यास मदत होते.
माणसाला आपल्या भावना, विचार व्यक्त करण्यास कोणीतरी जवळची व्यक्ती, मित्रमैत्रीण हवी असते; पण अशी व्यक्ती जरी आयुष्यात असेल, तरी तिच्यावर विश्वास ठेवणे अशक्य असते. याप्रसंगी डायरीच तुमचे विश्वासू मित्र किंवा मैत्रीण बनते. ती तुमचा एकटेपणा दूर करण्यास मदत करते.
अनेकजण एका दिवसभरात नवनवीन कल्पना मांडतात; पण त्यातील किती ते पूर्ण करू शकतात? हे जाणणे महत्त्वाचे आहे. आपण अनेक नवीन कल्पना मांडतो; पण त्या हवेतच विरळून जातात. कारण आपण अनेकदा बोललेल्या गोष्टी विसरतो. जेव्हा तुम्ही एखादी कल्पना मांडाल, आश्वासन द्याल आणि ते डायरीत लिहिले तर तुमचा त्या गोष्टीवरील फोकस स्पष्ट होण्यास मदत होते.
दैनंदिन जीवनात हजारो गोष्टी घडत असतात. या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूप कठीण असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान-मोठी गोष्ट डायरीत लिहायला सुरुवात कराल तेव्हा गोष्टी लक्षात येऊ लागतात. गरज असेल तेव्हा डायरीत लिहिलेली महत्त्वाची माहिती वापरू शकता.
आता डायरी लिहिण्याचे एवढे फायदे असतील तर तुम्ही आजपासून डायरीच्या माध्यमताून व्यक्त होण्यास सुरुवात करा. तुम्ही यामध्ये सातत्य ठेवले तर निश्चितच आजच्या धावपळीच्या जगण्यात त्याचे फायदे मिळतील.