Dhule News …मग मुस्लिम समाज त्यांचा परिवार नाही काय? अबू आझमी यांचा सवाल

Dhule News …मग मुस्लिम समाज त्यांचा परिवार नाही काय? अबू आझमी यांचा सवाल
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 140 करोड जनता हा त्यांचा परिवार असल्याचे सांगतात. मग मुस्लिम समाज त्यांचा परिवार नाही काय? असा संतप्त प्रश्न आज समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी धुळ्यात उपस्थित केला. गेल्या दहा वर्षात भारत हा कर्जबाजारी होतो आहे. तर सरकार शेतकरी, महिला, बालके आणि मुस्लिम विरोधी धोरण राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. राज्यात महाविकास आघाडी सोबत जाण्या संदर्भात अद्याप निश्चिती झाली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

समाजवादी पार्टीच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली आज धुळ्यात आली असता प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधला. यावेळेस कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांच्यासह धुळ्याचे सरफराज अन्सारी, आमीन पटेल, जमील मंसूरी, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अबू आझमी यांनी भारतीय जनता पार्टीवर शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याची टीका केली. या देशात विकासाच्या नावाखाली पूल तसेच अन्य कामे होऊ शकतात. मात्र कारखान्यांमध्ये अन्नधान्य तयार होणार नाही. या देशाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकरी अडचणीत आहे. एका वर्षात तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही बाब शेतकरी हिताच्या विरोधात असल्याची दिसते. या शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

या देशामध्ये महिला व बालकांवरील अत्याचार लक्षणीयरीत्या वाढले आहेत. याकडे देखील दुर्लक्ष केले जाते आहे. या सरकारच्या कालावधीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होऊन खून होतो. तर प्रक्षोभक भाषण करून देखील कारवाई होत नाही. वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने प्रक्षोभक भाषणांवर राज्य सरकारवर कठोर शब्दात टीका केलेली असताना सरकार अजूनही या संदर्भात ठोस पावले उचलत नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशातील 140 करोड जनता ही त्यांचा परिवार असल्याचे म्हणते. मात्र मुस्लिम समाज हा त्यांचा परिवार आहे की नाही, या संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या देशावर गेल्या 2014 पासून कर्जाचा डोंगर वाढतो आहे. प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाच्या डोक्यावर सव्वा लाख रुपये कर्ज असल्याचे सांगितले जाते. अशा धोरणांमुळे श्रीलंका आणि पाकिस्तानची परिस्थिती खराब झाली आहे. एकेकाळी सोन्याची चिडिया म्हणून ओळख असणारा आपला देश आता कर्जाच्या बोजाखाली दाबला जातो आहे. मात्र सरकार हिंदू मुस्लिम राजकारण करीत आहे. या सरकारने लग्नाचे वय 21 वर्षे केले. याला आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. 18 वर्षाचा वयाचा मुलगा मतदान करून सरकार बनवू शकतो. तसेच तो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकतो. पण तो विवाह करू शकत नाही. यावरून अठरा वर्ष वयात अनैतिकता करण्यास एक प्रकारे सहमती दर्शवणारा हा कायदा आहे. इस्लाम धर्मानुसार विवाहाचे वय झाले असल्यास लग्न केले पाहिजे. उशीर केला तर अशा कालावधीत केलेल्या गुन्ह्यास आई-वडील जबाबदार असल्याचे सांगितले जाते. यावरून या कायद्याला आपला विरोध असल्याचे देखील त्यातील स्पष्ट केले.

लव जिहाद कायद्यासंदर्भात देखील त्यांनी टीका केली. लोढा कमिटीने एक लाख लव जिहाद झाल्याचे सांगितले. पण कागदपत्रांची तपासणी केली असता या संदर्भात तथ्य आढळले नाही. यावर सरकार अजूनही बोलायला तयार नाही. या देशात धार्मिक स्थळां संदर्भात 1991 ला कायदा बनवला गेला. यात अयोध्येनंतर कोणत्याही पूजा स्थळाबाबत वाद होणार नाही, असे स्पष्ट केले गेले. तर 1947 मध्ये असलेली स्थिती तशीच राहील, असे देखील स्पष्ट केले गेले. तरीही मथुरा आणि ज्ञानव्यापी हे प्रश्न पुढे आले. अयोध्येच्या मशिदी खोदकामात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. सरकार हे देशाच्या मालमत्तेचे रक्षण करणारे असावे, अशी अपेक्षा आहे. मात्र हे सरकार देशाची मालमत्ता विक्री करण्याकडे लागले आहे. सरकारने पाच वर्षात लाखो रुपयाचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले आहे. 2014 पासून 14 लाख करोड रुपये माफ केले गेले, असा दावा देखील त्यांनी केला. या देशातील सरकार शहरांचे नाव बदलण्याकडे लागले आहे.

या देशात मुघलांचे राज्य होते. यातील औरंगजेब हे 52 वर्ष सत्तेत होते. त्यावेळी हा देश सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जायचा. या देशाची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. मात्र मोघलांच्या काळात हिंदूंची नावे असणाऱ्या शहरांची नावे बदलली गेली नाही. विशेष म्हणजे राम चरित्र मानस हा ग्रंथ देखील मुघलांच्या सत्ता कालावधीत लिहिला गेल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

मग त्यांनी स्वत: EVM फेकून द्यावे

ईव्हीएम संदर्भात विरोधकांकडून जोरदारपणे आरोप केला जातो आहे. यावरून असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत 400 पार चा नारा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांचा पक्ष 400 पार जाणार आहे, असा विश्वासच असेल तर त्यांनी निडर होऊन स्वतःच ईव्हीएम मशीन फेकून द्यावे ,असे आव्हान देखील त्यांनी दिले. तर महाराष्ट्रात महा विकास आघाडीच्या बाजूने जाण्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संविधान बचाव रॅली दरम्यान आपण जनतेशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे दोन नावे वर पाय ठेवून राजकीय प्रवास करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे बाबरी मशीद पडल्याच्या घटनेचे ते समर्थन करत असल्याचे देखील आझमी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news