पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दसऱ्याचा मुहूर्त साधत राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आज (दि.२५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्याबराेबर चर्चा केली. (Nilesh Rane) या नंतर निलेश राणे राजकीय निवृत्ती मागे घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे मंगळवारी (दि.२४) म्हटलं होतं. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं होत की,
"नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!"
निलेश राणे यांनी "मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही" अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकताच राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं हाेते.
हेही वाचा