
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. या प्रकरणावर आता २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीनंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याची रणनिती आखली आहे, असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
खैरे म्हणाले की, शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यानंतर राज्यातील सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. दरम्यान, खैरे यांच्या या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पटोले म्हणाले की, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही.
हेही वाचलंत का ?