पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात लोकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर साहिल साक्षीला चाकूने भोसकत राहिला. ( Delhi Murder case ) यावेळी येथून येणारे-जाणारे केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. कुणीही साहिलला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही, यामागच्या कारणमीमांसेला मानसशास्त्रात बायस्टँडर इफेक्ट असे म्हटलं जाते. खून, हल्ला असे जेव्हा गर्दीत सुरू असते, तेव्हा कुणाकडूनही मदतीची शक्यता कमी असते, असे ही थिअरी सांगते.
अमेरिकेत १९६४ मध्ये किटी नावाच्या एका युवतीची बलात्कारानंतर हत्या झाली होती. ४० जण आपापल्या घरातून ही भयंकर घटना पाहात होते. या वेळी किटी ओरडत राहिली; पण कुणीही मदतीला आले नाही. लोकांच्या या प्रतिक्रियेला गेनोव्हीज सिंड्रोम असे नाव देण्यात आले.
अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांनी भयंकर गुन्हा किंवा भीषण अपघातानंतर जमाव बघ्याची भूमिका कशी काय घेता यासाठी पहिला प्रयोग केला. त्यात काही लोकांना एका खोलीत बसवून वाट पाहण्यास सांगण्यात आले. काही वेळाने तिथे धूर येऊ लागला. लोक खोकू लागले. परंतु 38% शिवाय कुणीही खोलीत काहीतरी समस्या असल्याची तक्रार केली नाही. दुसर्या प्रयोगात खोलीत लोकांना एकटे ठेवून धूर सोडण्यात आला. यावेळी 75% लोकांनी धुराची तक्रार केली.
गर्दीतील कुणीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही. पहिली प्रतिक्रिया इतर कुणीतरी द्यावी असे गर्दीतील प्रत्येकाला वाटते. बाकीचे कुणी मध्ये पडत नाहीत, मग मीच का असे करावे, ही भावना असते. हल्लेखोर-पीडिताचे पर्सनल मॅटर असेल, आपण का मध्ये पडावे, हा एक विचार असतो. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर जमाव गोळा होतो तेव्हा मदत मिळण्याची शक्यता ६० टक्क्यांनी कमी होते. केवळ ४० टक्के लोकांकडून मदतीची शक्यता असते. मात्र एखाद्या एकट्या माणसाला एखादा व्यक्ती संकटात दिसला तर तो मदतीला धावून जाण्याची शक्यता अधिक असते, असेही सिद्ध झाले होते.
हेही वाचा :