पुणे : पुढारी वृत्तसेवा
देशात कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना दरातील घसरणीला आळा घालण्यासाठी नॅशनल अॅग्रिकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून (नाफेड) सुमारे अडीच लाख मे. टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून झाली असून, दरातील घसरणीला यामुळे ब्रेक लागला आहे.
जागतिक बाजारातून भारतीय कांद्याला मागणी वाढल्याचा परिणाम म्हणून ही दरातील घसरण थांबल्याचे सांगण्यात आले. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष व शरद जोशी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेऊन केली होती. तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन मूल्य स्थिरीकरण निधीअंतर्गत प्रतिकिलोस किमान 15 रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशीही मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत केंद्राने नाफेडमार्फत महाराष्ट्रात 2 लाख 20 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 20 शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदी व साठवणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. कांदा खरेदी सुरळीत सुरू राहून गैरप्रकार होऊ नये यासाठी पक्षाचे व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कांदा खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
कांद्याचे निर्यातदार प्रवीण रायसोनी म्हणाले की, मध्यंतरी पाकिस्तानातून जागतिक बाजारात कांदा निर्यात सुरू होती. तेथील हंगाम संपल्यानंतर भारतीय कांद्याला जागतिक बाजारातून मागणी वाढली असून श्रीलंका, आखाती देश, मलेशियामध्ये निर्यात सुरू आहे. चालूवर्षी विशेषतः महाराष्ट्रात कांद्याचे मुबलक उत्पादन अपेक्षित असून कांद्याची प्रत उत्तम आहे. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे शेतकर्यांनी मालविक्रीस हात आखडता घेतला असून मध्यंतरी क्विंटलला 900 ते 1000 रुपयांपर्यंत खाली आलेले दर वाढून आता 1000 ते 1300 रुपयांवर स्थिरावले आहेत.
नाफेडमार्फत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेतील लिलावांमध्ये कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुमारे दोन लाख मे. टन कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे.
– शैलेंद्र कुमार, शाखा व्यवस्थापक, नाफेड, नाशिक
लाल कांद्याची आवक संपुष्टात येऊन गरवी कांद्याची आवक वाढत आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे निर्यातीवर झालेला विपरीत परिणाम आता कमी झाला आहे. जागतिक बाजारात शेतमाल निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. शेतकर्यांकडून कांद्याची साठवणूकही चाळींमध्ये सुरू असून, नाफेडच्या खरेदीमुळे दर घसरणीस आळा बसणे अपेक्षित आहे.
– सुनील पवार, पणन संचालक, महाराष्ट्र