नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आपणास नीरव मोदी दिसत असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केले. त्यांच्या या विधानावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह भाजप खासदारांनी चौधरी यांनी माफी मागावी, अन्यथा अध्यक्षांनी कामकाजातून त्यांचे शब्द वगळावेत, अशी मागणी केली. अखेर अध्यक्षांनी वादग्रस्त विधान वगळण्याचे निर्देश दिले. 'घोटाळा करून नीरव मोदी विदेशात पळून गेले, पण आम्हाला येथेच देशात नीरव मोदी दिसत आहेत..'. असा टोमणा चौधरी यांनी पंतप्रधानांना उद्देशून मारला होता.
चौधरी यांनी आपल्या घणाघाती भाषणात 'जेथे राजा आंधळा असतो, तेथे द्रौपदीचे वस्त्रहरण होते' अशी टीका केली. यावरुनही सदनात गोंधळ झाला. मणिपूरमध्ये हाहाकार उडाला आहे, पण संसदेत मणिपूरच्या खासदारांना बोलू दिले जात नाही, असे सांगतानाच दोन समुदाया दरम्यान बफर झोन निर्माण करुन मणिपूरला विभाजण्याचे काम गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे, असा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदी शंभरवेळा पंतप्रधान होवोत, त्याच्याशी आमचे देणेघेणे नाही. पण आम्हाला लोकांची चिंता आहे, असे ते म्हणाले.