नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election) पार्श्चभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशा वातावरणात काॅंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये महिलांना राजकारणात येण्याचे आवाहन केलेले आहे. या निवडणुकीत ४० टक्के तिकीटे महिलांना देण्यात येणार असल्याची घाेषणा काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये (UP Election) काॅंग्रेसकडून प्रियांका गांधी मैदानात उतरल्या आहेत. ही पत्रकार परिषद देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना समर्पित आहे, असेही त्यांनी सांगितले. इतकंच नाही तर 'लड़की हूँ लड सकती हूँ' असा नाराही त्यांनी यावेळी दिला.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, "उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही ४० टक्के तिकिटे महिलांना देऊ. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे, राज्याची प्रगती हवी आहे".
"महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही, तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही या वेळी मजबूत नसला तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते तर ५० टक्के तिकीट महिलांना दिले असते. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती-धर्मात विभागले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे", असेही प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले.