नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 'मराठी' भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल, अशी मोठी घोषणा काँग्रेसने केली आहे. यापूर्वी आठवडाभरात दोन वेळा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही, असा प्रश्न काँग्रेसने विचारला होता. त्यांनतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान होत असताना आज (दि.१३) ही मोठी घोषणा (Congress) केली आहे.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत सांगितले की, 'देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल'. जयराम रमेश म्हणाले की, "डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देण्यात आला. ११ जुलै २०१४ ला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा घोषित करण्याची मागणी केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही केले नाही. देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित केले जाईल, असे वचन काँग्रेस पक्ष (Congress) देत आहे."
यापूर्वी दोनदा जयराम रमेश यांनी याच मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रंगनाथ पठारे समितीच्या अहवालाचा दाखल देत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये खासदार रजनी पाटील यांनी यासंदर्भात राज्यसभेत प्रश्न विचारला होता. या दोन्ही मागण्यांचा दाखला देत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेबद्दल महाराष्ट्रातील मतदार केंद्र सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवेल, असा इशाराही काँग्रेसने दिला होता.