पुढारी ऑनलाईन डेस्क : चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजप विरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक बोलवली आहे. (INDIA bloc meet) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी इंडिया आघाडीतील २८ पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. या बैठकीत पाच राज्यांमधील निवडणूक निकालावर चर्चा केली जाणार आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल आज (दि.३) जाहीर होत आहेत. तर मिझोराम विधानसभा निवडणूक निकाल सोमवार ४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यानंतर ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीत बैठक होणार आहे.
इंडिया आघाडीची पहिली बैठक ही २३ जून २०२३ रोजी पाटणा येथे झाली होती. यावेळी निमंत्रक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होते. यावेळी १५ पक्षांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांच्या ऐक्यावर यावेळी चर्चा झाली आहे. यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळूरु येथे विरोधी पक्षांच्या ऐक्याची दुसरी बैठक झाली. यावेळी २६ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव इंडिया ( इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स INDIA ) असे ठेवण्यात आले होते
इंडिया आघाडीची शेवटची आणि तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत झाली. यावेळी इंडिया आघाडीने प्रचार समिती, समन्वय/रणनीती समिती, मीडिया, सोशल मीडिया आणि संशोधन अशा पाच समितींची स्थापना केली होती. या बैठकीत 28 विरोधी पक्षांनी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीची रणनीतीवरही चर्चा केली होती.
हेही वाचा :