पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनातील विविध पदभरतीसाठी घेण्यात येणार्या परीक्षांची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर राजेनिबांळकर यांची नियुक्ती झाली आहे. याबरोबरच समितीच्या सदस्यपदी बृहन्मुंबई महापालिकेचे तत्कालीन अधिकारी (निवृत्त) सुरेश केकाणी, सेवानिवृत्त तत्कालिन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शहाजी श्रीरंगराव सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर या समितीच्या सदस्य सचिवपदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव असणार आहेत. राज्य शासनातील विविध विभागांच्या वेगवेगळ्या पदभरतीकरिता घेण्यात येणा-या परीक्षांची कार्यपध्दती संरक्षित करण्याची बाब 2023 मध्ये पावसाळी अधिवेशात उपस्थित करण्यात आली होती. या सदर्भात उपाययोजना सूचविण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे, असा अध्यादेश शासनाचे उपसचिव लीना संखे यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने स्थापन केलेली ही समिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची कार्यपध्दती संरक्षित करणार आहे. तसेच पेपरफुटी व इतर गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी उपाययोजना शासनास सुचविणार आहे. लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील परीक्षा वगळता इतर विभागातील विविध संवर्गाच्या परीक्षांची कार्यपध्दती व सदर परीक्षांसंदर्भात पेपरफुटी तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना सुचविणार आहे. समिती नियुक्त केल्यापासून तीन महिन्यांत शासनास अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे. या समितीमुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह शासनाच्या विविध विभागांच्या वेगवेगळ्या पदांच्या होणा-या परीक्षांवर अंकुश येईल. तसेच परीक्षांमधील गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे.
लोकसेवा आयोगासह राज्याच्या विविध विभागात होणा-या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षांची सिस्टीम कशी व्यवस्थित राहील, यासाठी समिती नियुक्त केली आहे. ही समिती अभ्यास करेल, त्यानुसार अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. या अहवालानुसार शासन परीक्षांबाबत कायदा पारित करणार आहे.
-किशोर राजेनिंबाळकर, अध्यक्ष, पदभरती कार्यपद्धती संरक्षण समिती
हेही वाचा