पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचे प्रभू राम यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत माफीनामा सादर करत, भावना दुखावेल्या रामभक्तांची माफी मागितली. परंतु विरोधक त्यांच्या अशा माफीनाम्यावर असमाधानी आहेत. यावरूनच भाजप नेत्या, महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्ष चित्रा वाघ यांनी "पश्चातापाशिवाय खेद व्यक्त करणं म्हणजे, मगरीने अश्रू ढाळण्यासारखं आहे" असे म्हणत आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. (Chitra Wagh On Jitendra Awhad)
'प्रभू राम शाकाहारी नव्हे तर मासांहारी होते', आव्हाडांच्या वक्तव्यावरून राज्यातील नव्हे तर देशातील वातावरण तापले आहे. आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर माफीनामा सादर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाते नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी "माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी खेद व्यक्त करतो" असे म्हणत रामभक्तांची माफी मागितली. परंतु अजूनही विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधक आव्हाडांवर टीका करत आहेत. (Chitra Wagh On Awhad )
चित्रा वाघ यांनी केलेल्या X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 'चूक मान्य नाही, पण खेद व्यक्त करतो', अशी भाषा करणाऱ्या हाड हाड ला खरोखरच उपरती झालीय का? चूक मान्य नाही, याचा अर्थ राम मांसाहारी होता, या आपल्या धादांत खोट्या विधानावर हाड हाड अजूनही ठाम आहे". (Chitra Wagh On Awhad )
हाड हाड च्या खाटिकखान्यात सश्रद्ध हिंदूंच्या भावनांवर सुरी चालवण्याचा आसुरी प्रकार सुरूच आहे. ह्या काल्पनिक हाड हाड मटण शॅापमध्ये जबरदस्तीने हिंदू देवी-देवतांना ओढणाऱ्यांना आपण केलेल्या किळसवाण्या प्रकाराचा किती खेद वाटतोय, ते त्याच्या पत्रकार परिषदेतून दिसलं, अशी टीका देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.