![मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोंबिवलीतील ‘ती’ मशाल ठाकरे गटाच्या हाती](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2F%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात मशाल चिन्ह दिले आहे. त्यानंतर डोंबिवली येथील पाथर्ली येथे तात्या माने यांच्या नगरसेवक निधीतून उभारलेल्या मशालीची पूजा करण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी 2004 – 05 साली या मशालीचे उद्घाटन केले होते. आणि आता तीच मशाल ठाकरे गटाच्या हाती गेली आहे. यामूळे डोंबिवली शहरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तत्कालीन नगरसेवक तात्या माने यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांची आठवण राहावी आणि चांगले काम करण्यासाठी पेटून उठण्याची ऊर्जा मिळावी यासाठी या मशालीच्या प्रतिकृतीची स्थापना केली होती. सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यानुसार अंधेरी येथील पोटनिवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह ठाकरे गटाला दिले आहे. त्यामुळेच सोमवारी रात्री मशालीची प्रतिकृती स्वच्छ धुवून त्याची पूजा करण्यात आली . यावेळी ठाकरे गटाने जल्लोष साजरा केला.