पुढारी ऑनलाईन: राज्यातील ९ जिल्हयांमध्ये सोयाबीन पीकावर 'मोझेक' विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा देखील सोयाबीन पिकांवर परिणाम झाला आहे. याची दखल घेत सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
पावसात पडलेल्या मोठा खंड आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस तसेच तापमान झालेला बदल यामुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचेही मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यांत मोझेक या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने येथील सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे. या उद्देशाने लवकरात लवकर पंचनामे करावेत, असे निर्देश मंत्रिमंडळातून देण्यात आले आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात 'आनंदाचा शिधा' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि.३) मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decisions) घेण्यात आला आहे. याआधी देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येत होते. मात्र यावेळी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.