![Naresh Goyal : जेट एअरवेजच्या गोयल दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाचा दिलासा; ईडीला धक्का](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2F%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेला मनी लॉंड्रिंगचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने गोयल दाम्पत्याला दिलासा दिला आहे तर ईडीचा निर्णय रद्द करत मोठा धक्का दिला आहे
2020 मध्ये एका ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध गोयल आणि इतरांनी केलेल्या कथित फसवणुकीशी संबंधित मुंबई पोलिसांच्या एफआयआरची दखल घेत, ईडीने मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायदा, 2002 अंतर्गत गोयल दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने हा खटला रद्द करत जेट एअरवेजच्या गोयल दाम्पत्याला दिलासा दिला आहे.
याप्रकरणावरील गुरुवारी (दि.२३) सुनावणी दरम्यान मूळ गुन्हाच अस्तित्त्वात नसेल तर त्याआधारे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारी तक्रार (ईसीआयआर) कशी कायम राहू शकत नाही. तसेच तसेच मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द झाल्याने ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ईडीने दाखल केलेला ईसीआयआर आणि त्याआधारे सुरू केलेली कारवाई बेकायदा व कायद्याशी विसंगत आहे. अशी याचिका गोयल दाम्पत्यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे ईडीने दाखल केलेले प्रकरण रद्द करण्याची मागणी देखील या याचिकेद्वारे गोयल दाम्पत्याने केली होती. ती न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायामूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मान्य करत, त्यांच्यावरील खटला रद्द केला आहे.