पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या कारवाईपासून सर्वाेच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यानंतर पडद्याआड राहून भाजपच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही आता दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या नवीन खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. १२ जुलैपर्यंत शिंदे गटाला न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उघडपणे सहभाग असल्याचे दाखविणे भाजपने टाळले आहे. थांबा आणि वाट पहा अशी भूमिका भाजपने घेतली असली तरी कालपासून भाजपच्या गोटात मात्र हालचालींना वेग आला आहे. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस विशेष विमानाने पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामळे सुरू असलेल्या सत्तानाट्यात भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.