पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा आहुजा यांनी नुकताच एकनाश शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पण काही वर्षांपूर्वी भाजप नेते राम नाईक यांनी 'गोविंदा यांनी निवडणुकीत कुख्यात गुंड दाऊद याची मदत घेतली होती' असा आरोप केला होता. आजही ते आपल्या मतावर ठाम आहेत. मग आता हिंदुत्वाचे फुकटचे गोडवे गाणारे शिंदे गोंविदासोबत कसा संसार थाटणार आणि कसं जनहित साधणार? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. शिवसेना यूबीटी गटाने X वर याबाबत पोस्ट करत शिंदेंवर निशाणा साधला आहे. (Govinda news)
गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राम नाईक यांनी प्रतिक्रिया देताना, मी माझ्या आरोपावर आजही ठाम असल्याचे म्हटले आहे. गोविंदा यांनी दाऊदची मदत घेतली होती, या आरोपावर मी ठाम आहे. मी माझ्या पुस्तकात या आरोपाचा उल्लेख केला आहे. पण त्यावर गोविंदा काहीच बोलले नाहीत, असे राम नाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अशी शक्यता अआहे की, ते उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून गोविंदा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहतील. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकीटवर उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर गोविंदा आणि मतदारसंघाचा काही संबंध राहिला नव्हता.
पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी निवडणुकीत गोविंदा यांनी दाऊद इब्राहिम याची मदत घेतली होती, असा आरोप केला होता. आताही या आरोपावर राम नाईक ठाम आहेत. राम नाईक यांनी त्यांच्या पुस्तकात पण या आरोपांचा उल्लेख केला आहे.
गोविंदा यांनी याआधी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ मध्ये लोकसभा लढवून भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र खासदार म्हणून छाप पाडण्यात त्यांना अपयश आले होते. तसेच त्यांना प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याच्या कानाखाली आवाज काढल्यामुळे गोविंदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर ते राजकारणातून दूर गेले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत घेतले आहे.
राम नाईक यांनी त्यांचे आत्मचरित्र 'चरैवेती चरैवेती'मधून गोविंदा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. १९९९ ते २००४ या काळात केंद्रीय मंत्री राहिलेल्या राम नाईक यांनी त्यांच्या पुस्तकात, तीन वेळा खासदार असतानाही आणि मुंबईसाठी इतकं मोठं योगदान देऊनही त्यांना ११ हजार मतांच्या फरकाने झालेला पराभव पचवता आला नसल्याची भावना व्यक्त केली होती. गोविंदा हे दाऊद आणि ठाकूर यांचे मित्र होते आणि त्यांनी (गोविंदा) त्यांचा वापर मतदारांना घाबरवण्यासाठी केला, असा उल्लेख त्यांनी पुस्तकात केला होता. (Govinda news)
हे ही वाचा :