![‘जलजीवन’ ची कामे न करताच सव्वातीन कोटी लाटले : निलेश राणेंचा विनायक राऊतांवर आरोप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FUntitled-design-2024-04-14T182304.694.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सिंधुदुर्ग: पुढारी वृत्तसेवा : लांजा तालुक्यात केंद्र सरकारच्या मदतीवर ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या जलजीवन योजनेतील कामात ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मदतीने विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सव्वातीन कोटींची रक्कम ठेकेदाराकडून स्वीकारून मोठा भ्रष्टाचार केला. कामे न करताच पैसे हडप करण्यात आले, असा गंभीर आरोप भाजप नेते व कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी आज (दि.१४) पत्रकार परिषदेत केला. या भ्रष्टाचाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे पैसे चोरणारा खासदार म्हणून विनायक राऊत यांची नवी ओळख झाली आहे, असेही ते म्हणाले. Nilesh Rane
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी 64 कोटी 41 लाख 67 हजारांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून तालुक्यातील 109 महसुली गावात कामे होणार होती. 33 कोटी 92 लाख 30 हजारांची कामे शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हा समन्वयक व शिव साई असोसिएटचा मुख्य प्रमोटर रवींद्र डोळस यांनी घेतली होती. जवळपास एका गावातीलच फक्त 13 लाख रुपये किमतीची कामे पूर्ण असताना त्या ठेकेदार कंपनीला 16 कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली. व यातील सव्वातीन कोटी रुपये हवाला रक्कम खासदार विनायक राऊत यांना त्या ठेकेदाराने दिले. Nilesh Rane
या कामातील रक्कम त्यांनी स्वीकारल्याचा उल्लेख व तसा पुरावा आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण प्रथम पोलीस ठाण्यामध्ये एफआरआय दाखल करणार आहोत. अनेक भ्रष्टाचार त्यांनी केले असून सरकारी योजनेतील आणखी दोन-तीन भ्रष्टाचार आपण लवकरच बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांचे रेडी पोर्टचे मॅनेजर विजय पाल यांच्याशी सेल्फी घेतलेल्या फोटो आपल्या हाती आला आहे. मायनिंग भ्रष्टाचारातील सहभाग या फोटोवरून दिसून येतो, असे सांगून भाजपचे नेते नारायण राणे यांच्याविरोधात बोलाल, तर याद राखा व आमच्या नेत्यांबद्दल शिस्तीत रहा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महिलांच्या मनातही खासदार विनायक राऊत यांच्या बद्दल तिरस्कार आहे.
कणकवली प्रहार भवनातील जागा भाड्याने देऊन लाभार्थी बनल्याचा खासदार विनायक राऊतांचा आरोप निलेश राणे यांनी फेटाळून लावला. एमएसएमई कार्यालयाला प्रहार भवनामध्ये दिलेल्या जागेचे एक रुपयाही भाडे घेतलेले नाही. ही जागा मोफत दिली आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. यामध्ये तथ्य आढळल्यास राऊत राणेसाहेबांचे पाय धरतील का?, असा सवाल राणे यांनी केला.
हेही वाचा