रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेच उमेदवार? | पुढारी

रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेच उमेदवार?

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महायुतीमध्ये राज्यातील 9 लोकसभा मतदार संघांचा तिढा कायम असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर अखेर भाजपनेच आपला हक्क प्रस्थापित करत नारायण राणेंना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना विधानसभेचा पर्याय देण्यात आला आहे.

राज्यातील 9 जागांवर लवकरच तोडगा काढू असे गुरुवारी भाजपनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 9 जागांच्या तिढ्यासंदर्भात चर्चा पूर्ण करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, सातारा या जागा भाजपला मिळणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नारायण राणे, सातार्‍यामध्ये छत्रपती उदयनराजे, ठाण्यात माजी खासदार डॉ. संजीव नाईक, तर पालघरमध्ये डॉ. राजेंद्र गावीत हे कमळ चिन्हावर लढतील, असे सांगण्यात येते. शिंदे यांच्या शिवसेनेला संभाजीनगर आणि उत्तर मध्य मुंबई हे मतदार संघ दिले जाणार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक मतदार संघ दिला जाणार आहे. दक्षिण मुंबईत भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांना रिंगणात उतरवले जाणार आहे.

तिढा असलेल्या मतदार संघांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, संभाजीनगर, नाशिक, सातारा या मतदार संघांचा समावेश आहे. महायुतीकडून संभाजीनगरमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे उमेदवार असणार आहेत. तर उत्तर मध्य मुंबईत अभिनेता गोविंदा यांना शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना विरोध झाल्यास दुसरा उमेदवार दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 5 जागांवर भाजप शनिवारपर्यंत उमेदवार जाहीर करणार आहे. त्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले उमेदवार जाहीर करतील. दरम्यान महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार असणार आहेत. शरद पवार यांची गुरुवारी भेट घेत त्यांनी त्याबाबत मागणी केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान मुंबईमध्ये उत्तर मुंबईतून शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी द्यावी तर दक्षिण मुंबईतील अनिल देसाईंची उमेदवारी मागे घेवून ती जागा काँग्रेसला द्यावी. त्या जागेवर वर्षा गायकवाड लोकसभा लढवतील असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.

Back to top button