नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात सुमारे शंभर किलो गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखाच्या विशेष पथकाने पकडले आहे. दोघांकडून २० लाख रुपयांचा १०१ किलो गांजा जप्त केला आहे. दोघांपैकी एका संशयिताविरोधात याआधी भांगचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात जामीनावर आल्यानंतर त्यांनी गांजाची तस्करी सुरु केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बाळू शेलार (३२, रा. मानकर मळा) व नीलेश अशोक बोरसे (२७, रा. अमृतधाम) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी गस्त सुरु केली असून गुन्हेगारांची धरपकड केली जात आहे.
विशेष पथकाचे पोलिस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना गांजाची वाहतूक सुरू असल्याचे समजले. पथकाचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत तोडकर, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, भूषण सोनवणे, किशोर रोकडे, भारत डंबाळे, नितीन भालेराव, अर्चना भड यांच्या पथकाने सापळा रचला. दोघांनाही म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडले. त्यावेळी (एमएच ०४ बीक्यू ०७७८) क्रमांकाच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये २० लाख ३६ हजार ६०० रुपयांचा १०१ किलो ८८० ग्रॅम गांजाचा साठा पथकाने जप्त केला.
यापूर्वी ६०४ किलो भांग जप्त
जानेवारी २०२३मध्ये नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शालिमार परिसरातील वावरे लेनमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून ६०४ किलो भांग जप्त केली होती. याप्रकरणी शेलार विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यावर संशयित शेलार याने पुन्हा अंमली पदार्थांची विक्री, साठा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची शक्यता आहे.
हेही वाचा :