पुढारी ऑनलाई डेस्क : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) सुरू होऊन एक आठवडा पूर्ण होत आला आहे. काँग्रेसने या यात्रेचा पुढील कार्यक्रम देखील गुरूवारी जाहीर केला. गुजरात ते अरूणाचल प्रदेश असा हा नवा पूर्व-पश्चिम भारत दौरा असेल अशी माहिती देण्यात आली. सध्याची चालू असणारी यात्रा संपल्यानंतर या नव्या प्रवासाला सुरूवात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केरळच्या कोल्लम येथे एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये AICC चे महासचिव जयराम रमेश यांनी हे जाहीर केले आहे. ते यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेच्या यशानंतर लवकरच पूर्व ते पश्चिम असा नवा उपक्रम हाती घेणार आहोत. याचे कारण असे आहे की, पक्षाला नव्या उपक्रमाद्वारे आणखी ऊर्जा मिळू शकेल. त्याचबरोबर यामुळे लोकांचे प्रश्न देखील जाणून घेता येतील. भारत जोडो यात्रेनंतर 2023 मध्ये गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड या प्रवासामधून भारतातील सर्व लोकांशी संवाद साधता येईल.
जयराम रमेश या मुलाखतीमध्ये पुढे असे देखील म्हणाले की, या यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यक्रम हाच भारतीय राजकारण बदलण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मला वाटते. मला विश्वास आहे की भारत जोडो यात्रा भारतीय राजकारणात बदल घडवून आणेल आणि काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करेल. भाजप या भारत जोडो यात्रेवर टीका करत आहे मात्र याचा या कोणताही परिणाम यात्रेवर होणार नाही. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आता काँग्रेस मागे हटणार नाही.
हेही वाचा