![सर्वोच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2FSupreme-court.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : ओडिशातील बालासोर कोरोमंडल रेल्वे अपघाताची चाैकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका ॲड. विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे.
नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रणालीमध्ये कवच प्रणाली त्वरित लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश देण्यात यावे, अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.
रेल्वे अपघाताची कारणे शोधून काढण्याबरोबरच रेल्वेची सुरक्षा तसेच धोक्यांचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेल्या आयोगाची स्थापना करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत. तसेच अपघाताच्या चौकशीसाठी जो आयोग नेमला जाईल, त्याला आपला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला जावा, असे अॅड. विशाल तिवारी यांनी केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे.
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (दि.०२) तीन रेल्वे गाड्याची धडक होऊन भीषण अपघात झाला. आत्तापर्यंत सुमारे २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचे कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "या भीषण अपघाताचे कारण कळाले आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल करण्यात आल्याने हा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.