![Ayodhya Ram mandir Pran Pratishtha : पीएम मोदींचे कठोर व्रत! 11 दिवस केवळ नारळ पाण्याचे सेवन आणि जमिनीवर निद्रा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2FModi-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ayodhya Ram mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यादरम्यान रामलल्लामूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील 11 हजारांहून अधिक व्हीआयपींना (अति महत्वपूर्ण व्यक्ती) आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, पीएम मोदी हे रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीच्या 11 दिवस आधीपासून धार्मिक अनुष्ठान करत आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी पंतप्रधान मोदी जमिनीवरच झोप घेत आहेत. तसेच ते 11 दिवसांच्या अनुष्ठानादरम्यान ते फक्त नारळ पाण्याचे सेवन करत आहेत. ते अष्टांग योगातील यम-नियमांचे पालन करून अनुष्ठान करत आहेत, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धार्मिक अनुष्ठानाला १२ जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. त्यावेळी त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून या धार्मिक अनुष्ठानाबाबत माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, 'अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला केवळ 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. परमेश्वराने मला या अभिषेक दरम्यान भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी 11 दिवसांचे अनुष्ठान विधी सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे.' अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
प्राणप्रतिष्ठा हे देवतेच्या मूर्तीमध्ये दैवी चेतनेचे प्रकटीकरण म्हणून वर्णन केले आहे. पवित्र शास्त्रात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी उपवास करण्याच्या नियमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 दिवस कठोर अनुष्ठान करण्यासोबतच उपवास करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी म्हटलं आहे. (Ayodhya Ram mandir Pran Pratishtha)
यम -नियमाचा अर्थ खूप व्यापक आहे. यम म्हणजे संयम आणि नियम म्हणजे शिस्त जो अष्टांग योगाचा एक भाग आहे. योगाचे मूळ ध्येय म्हणजे समाधीपर्यंत पोहोचणे म्हणजेच ब्रह्मामध्ये विलीन होणे. ध्यान म्हणजे पाहणे म्हणजेच ब्रह्माशी एकाग्र होणे आणि ब्रह्माचे चिंतन करणे. त्याचा दुसरा भाग म्हणजे भजन अर्थात ईश्वराची उपासना करणे. तसेच, अष्टांग योगाचे आठ भागांमध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीचा समावेश आहे.