पुढारी ऑनलाईन: राज्यसभेची निवडणूक होऊन काही तास उलटत नाहीत तोच आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकारण जोरदार तापताना दिसत आहे. अशातच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्या वाट्याला निराशा आली होती. परंतु विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांनी मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना मतदान करता आले नव्हते. विधान परिषद निवडणुकीतील मतदानाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार असून नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात २० जून रोजी १० जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. अवघ्या आठवड्यावर आलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास राज्यसभेमुळे कमालीचा दुणावला आहे. तसेच विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत.