सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सध्या सगळीकडेच पर्यावरण पूरक इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र 129 वर्षापूर्वीच सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली होती. इ. स. 1985 साली रददी कागद, कामटया, खळ, डिंक, कापड आदी पर्यावरण पूरक साधनांचा वापर करून आजोबा गणपतीची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्यात आली. त्यामुळे खर्या अर्थाने इको फ्रेण्डली गणेशोत्सव ( Eco Friendly Ganeshotsav ) या संकल्पनेचा उद्घाता सोलापुरातील आजोबा गणपतीच आहे, त्यामुळे भारतातील पहिले इको फ्रेण्डली गणेशोत्सव मंडळ हे सोलापूरचे आजोबा गणपती मंडळ आहे, असे मानले जाते.
1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आजोबा गणपतीची सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची स्थापना केली होती. यासाठी स्व. अप्पासाहेब वारद यांनी पुढाकार घेतला होता. यंदा या मंडळाचे 129 वे वर्ष आहे. श्रद्धानंद समाज सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी माणिक चौकातील सुफीसंत मगरीबशाह बाबा हे अत्यंत श्रद्धेने आजोबा गणपतीचे दर्शन घेत असत. पुढे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक पिढीतील वारसदारांनी ही परंपरा जोपासली आहे. यावरून आजोबा गणपतीच्या उत्सवात अथवा इतर कार्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक दिसते
श्रद्धानंद समाज स्थापीत आजोबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेला यंदा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण झाले आहे. आजोबा गणपतीच्या स्थापनेसाठी त्यावेळचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन कावळे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेशारी, पारकर, म्हमाणे, ओणामे, दर्गापाटील, नंदयाळ, आवटे आदी घराण्यातील व्यक्ती एकत्रित आले. आजोबा गणपती सुरुवातीला काही वर्षे शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर व त्यानंतर त्रिपूरांतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता.अनेक वर्षे माजी महापौर (कै.) विश्वनाथ बनशेटटी यांच्या माणिक चौकाजवळील ट्रंक कारखान्यात गणेश उत्सवात आजोबा गणपती बसविण्यात येत होता.
शुक्रवार पेठ येथे स्वामी श्रध्दानंद यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजधुरीणीनी त्रिपुरांतेश्वर मंदिरात एकत्र येऊन श्रध्दानंद समाजाची स्थापना केली. श्रध्दानंद समाजाच्यावतीने गणेशोत्सव साजरा करताना तरुणामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला. याकरिता श्रध्दानंद व्यायाम शाळा, दांडपटटा वर्ग सुरू करण्यात आले. तरुणामध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि वैचारिक प्रबोधन निर्माण होण्याकरिता युवक मेळावे भरविले जात. स्वातंत्र चळवळीत सहभागी होणार्या तरुणामध्ये शुक्रवार पेठेतील तरुणांची संख्या त्याकाळी मोठी होती. त्यामुळे स्वातंत्र सैनिकांची पेठ अशीही शुक्रवार पेठेची ओळख आहे. एकदा लोकमान्य टिळक सोलापुरात (कै.) अप्पासाहेब वारद यांच्याकडे आले होते. तेव्हा सोलापुरातील शुक्रवार पेठेत आजोबा गणपती उत्सवात पानसुपारी कार्यक्रमास ते उपस्थित राहिले होते.
सोलापुरातील लाला मुन्शीराम हे लाहोर उच्च न्यायालयात प्रसिद्ध वकील होते. त्यांनी पुढे संन्यासाची दीक्षा घेतली. त्यानंतर ते स्वामी श्रद्धानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. 18 डिसेंबर 1826 रोजी एका माथेफिरूने त्यांच्या निवासस्थानी घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सोलापुरात त्यावेळी घटनेचा निषेध नोंदवत सोलापुरातील युवक त्रिपुरांतकेश्वर मंदिरात एकत्र येऊन स्वामी श्रद्धानंद यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे कार्य पुढच्या अनेक पिढीस समजावे यासाठी श्रद्धानंद समाजाची स्थापना करण्यात आली. याच श्रद्धानंद समाजाच्या मार्गदर्शनाखाली आजोबा गणपती मंडळ आणि आता ट्रस्टची वाटचाल होत आहे. मंडळाची सामाजिक कार्याची उंची दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
दरम्यान, 1985 सालची गणपतीची मूर्ती जुनी झाल्याने 1993 साली केरळच्या कलाकाराकडून तणस, गूळ, कापड, गवत, शाडू, डिंग, या साहित्याचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने सध्याची गणेशाची मूर्ती बनविण्यात आली आहे. केवळ इको गणेशोत्सवाची सुरुवात न करता इको-फ्रेण्डली गणेशोत्सवाचा आजपर्यंत अवलंब करण्याचा आदर्श आजोबा गणपती मंडळाने समाजासमोर ठेवला आहे.
आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम आजोबा गणपती ट्रस्टने राबवले आहेत. त्यामध्ये नैसर्गिक आपादग्रस्तांना मदत, रुग्णांना आर्थिक व वैदयकिय मदत, कुष्ठरोग्यांना मिष्टान्न वाटप, बालसुधार गृहामध्ये फळे वाटप, मुक्या जनावरांसाठी पाणपोई, विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार, लर्निंग लायसन्स शिबिर, वृक्षारोपण, हुंडाबळी विरोधी प्रबोधन, ऐच्छिक रक्तदान, स्त्रीभून हत्या विरोधी जनजागरण, लेक वाचवा पाणी वाचवा अभियान, जलपूर्नभरण, स्त्रीयावरील अत्याचार या विषयावर जनजागृती आदी उपक्रमाचा याठिकाणी प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय समाजातील वंचित लोकांना न्याय मिळवून देताना देशात कुठेही नैसर्गिक संकट आले की संकटमोचन म्हणून मदतीला धावून जाण्याची एक संस्कृती आजोबा गणपती ट्रस्टने टिकवून ठेवली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आजोबा गणपती ट्रस्टने अन्नधान्यासह कपड्यांची मदत देत मदतीचा हात देण्याचा सर्वात प्रथम श्रीगणेशा केला केला.
आजोबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सुमारे पाचशे तरुणांचा ताफा लेझीमचा बहारदार खेळ सादर करतो. त्यांच्यात एक ताल-एक सूर दिसून येतो. 11 दिवस गणेशोत्सवात विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना पूजेसाठी बोलावून त्यांचा मान-सन्मान केला जातो. सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात या आजोबा गणपती मंडळाच्या पदाधिकार्यांचा मोठा वाटा असतो.
हेही वाचा :