![Ajit Pawar On Devendra Fadnavis](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2FUntitled-design-62-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब हे अधिवेशनादरम्यान सत्ताधारी बाकावर बसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी पत्र लिहिले. फडणवीसांनी मलिकांना महायुतीत घेण्यास नकार दिला आहे. यावर आज अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले असून, मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात जाण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आरोग्याच्या कारणास्तव नवाब मलिक तुरूंगातील सुटकेनंतर ते काल प्रथमच राजकीय पटलावर उपस्थित होते. दरम्यान नवाब मलिक यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. नवाब मलिक यांचे मत काय आहे हे जाणून घेऊन, मग पक्षाचे मत मांडणार अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. दरम्यान, विधानसभेत कोणी कुठे बसावं हे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही, असेही पवार यांना माध्यमांशी बोलतना स्पष्ट केले. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशा आशयाचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रानंतर अजित पवार काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांची भूमिका ऐकल्यानंतरच पक्ष भूमिका मांडेल असे स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे की, माजी मंत्री आणि विधानसभेचे सदस्य नवाब मलिक आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले. विधानसभा सदस्य म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही. हे मी प्रारंभीचं स्पष्ट करतो. (Devendra Fadnavis on Nawab Malik) मात्र ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत. ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते मात्र देश महत्वाचा आहे. सध्या नवाब मलिक केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने ते बाहेर आहेत. त्यांच्यावरिल आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांचे आपण स्वागत करु, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Nawab Malik)
आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. मात्र, महायुतीला बाधा पोहचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावा लागतो, असे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना उद्देशून म्हटले आहे. नवाब मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या महाविकास आघाडीशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाहीत. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी आशा आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे