दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; गणेश दर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Rajasthan Accident
Rajasthan Accident

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील रणथंभौर गणेश मंदिरात दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. दिल्ली-मुंबई महामार्गावर माधोपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. तर दोन लहान मुले गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आज (दि.५) सकाळी ८ वा. च्या सुमारास हा अपघात झाला.

सीकरहून रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी हे कुटुंब कारमधून जात होते. त्याचवेळी दिल्ली-मुंबई महामार्गावर बाउंली पोलीस ठाणे हद्दीतील बनास पुलियाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात या कुटुंबातील दोन लहान मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूरा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी धर्मपाल यांनी सांगितले की, मृतांमध्ये मनीष शर्मा त्यांची पत्नी अनिता शर्मा, संतोष शर्मा आणि त्यांची पत्नी कैलाश शर्मा, सतीश शर्मा आणि त्यांची पत्नी पूनम शर्मा, यांचा समावेश आहे. कुटुंबातील सदस्य आल्यानंतरच मृतांच्या नावांची अधिकृत खात्री केली जाईल. अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांना बाऊनलीच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, त्यानंतर त्यांना जयपूरला रेफर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news