Congress Meeting : काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र, निवडणुकीतील राजस्थान, मिझोराम मधील पराभवावर चिंतन

Congress Meeting : काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र, निवडणुकीतील राजस्थान, मिझोराम मधील पराभवावर चिंतन
Published on
Updated on
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ तेलंगणा राज्य मिळवता आले. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारी (९ डिसेंबर) राजस्थान आणि मिझोरम राज्यातील पराभवावर काँग्रेस मुख्यालयात मंथन करण्यात आले. दिल्लीस्थित कॉंग्रेस मुख्यालयात सलग दुसऱ्या दिवशी पराभवावर समिक्षा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के सी वेणूगोपाल, दोन्ही राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष तथा प्रमुख नेते उपस्थित होते. हा निकाल अनपेक्षित आहे, मात्र पक्षाच्या वतीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पूर्ण एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत पराभव झाला असला तरीही नव्या उमेदीने आणि पूर्ण ताकदीने येणारी लोकसभा निवडणूक लढू, असे या बैठकीनंतर काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. तत्पूर्वी शुक्रवारी मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील पराभवावर समिक्षा करण्यात आली. (Congress Meeting)
देशात नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडला. यात काँग्रेसला केवळ तेलंगणा राज्य मिळवता आले. सत्ता असलेले राजस्थान आणि छत्तीसगड असे दोन महत्वाचे राज्य काँग्रेसने गमावले. यासह मध्यप्रदेश आणि मिझोरममध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर पराभवाची समिक्षा करण्यासाठी राजस्थान आणि मिझोरम राज्याची बैठक दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयात पार पडली.(Congress Meeting)
या बैठकीनंतर राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजस्थान निवडणुकीवर बैठकीत दीर्घकाळ चर्चा झाली. राजस्थानमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांची तुलना केल्यास, यावेळी आमची कामगिरी चांगली होती. भाजपपेक्षा आमची मतांची टक्केवारी फारच कमी आहे. यावेळी आमचे ७० आमदार निवडून आले आहेत. ८ ते ९ आमदार केवळ तीनशे ते पाचशे मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. पक्षाने निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली होती. यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तसेच निवडणुकीतील पराभवानंतर कोणाच्याही राजीनाम्यावर चर्चा झाली नाही आणि कोणीही राजीनामा दिलेला नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली तशी लोकसभा निवडणुकही पूर्ण ताकदीने लढवली जाईल. या निवडणुकीत पक्ष पूर्ण एकजूट होता आणि पुढेही राहील. या बैठकीला राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा, मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटसारा, माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग तथा राजस्थानचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news