पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या सदस्यांना निरोप देण्यात आला. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचाही समावेश आहे. मात्र, हा कार्यकाळ संपला असला तरीही ते पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्य होतील, हे स्पष्ट आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशिवाय दिनेशचंद्र जेमलभाई अनावादिया आणि लोखंडवाला जुगलसिंह माथुर या ३ भाजप खासदारांचा राज्यसभेतील कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. तर तृणमुल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणइ सुखेंदु शेखर रे यांचाही कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.
भाजप आणि तृणमुल काँग्रेस शिवाय, काँग्रेसचे खासदार प्रदीप भट्टाचार्य यांचाही कार्यकाळ १८ ऑगस्टला पूर्ण होईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, तृणमुलचे डेरेक ओब्रायन, शुभेंदु शेखर रे आणि डोला सेन हे खासदार पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्य होतील, असे बोलले जात आहे. राज्यसभेतील निरोपाच्या भाषणात डेरेक ओब्रायन म्हणाले की, या क्षणी पंतप्रधान सभागृहात असते तर बरे झाले असते.
खासदारांना निरोप दिल्यानंतर मणिपूरबाबत राज्यसभेत पुन्हा गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या व्यासपीठाजवळ येऊन 'मणिपूर मणिपूर', 'पंतप्रधान जवाब दो'च्या घोषणा दिल्या. सभागृहात वाढत्या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही आणि सभागृह तहकूब करण्यात आले.