

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरचे राज्य म्हणून अस्तित्व राहिले नाही. मणिपूरचे विभाजन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारत मातेची हत्या केली आहे. मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हसताना पाहिले. मणिपूर जळत असताना ते हसत आहेत. त्यांना देशात काय सुरु आहे? हे समजत नाही. मणिपूरचे दोन भाग झाले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत भाषण केले. मोदी यांनी या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. यानंतर आज (दि.११) राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. (Rahul Gandhi On Manipur)
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी काल स्वत:च्या महत्वकांक्षा सांगण्यासाठी भाषण केले. त्यामध्ये भारताच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्यांनी भाष्य केले नाही. आम्ही मणिपूरमध्ये गेलो, तेव्हा आम्हाला तिथे स्पष्टपणे सांगण्यात आले की, तुमच्यासोबत कोणी कुकी असेल तर त्याची हत्या करण्यात आली आहे. भारतीय आर्मीला पाचारण केल्यास मणिपूरमधील परिस्थिती पूर्ववत होऊ शकते. मात्र, मोदी-शहांना तेथील हिंसाचार सुरुच ठेवायचा आहे. (Rahul Gandhi On Manipur)
पंतप्रधान मोदींना माझा चेहरा टीव्हीवर पहायला आवडत नाही. मला माहिती आहे की, प्रसार माध्यमांवर त्यांचे नियंत्रण आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. मणिपूर गेल्या ४ महिन्यांपासून जळत आहे. मोदी सरकार तेथील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण देशाचा विचार करायचा असतो. मात्र, मोदी यांना त्याचे गांभिर्य नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी बोलतना केली. (Rahul Gandhi On Manipur)