कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेडसह शिरुर तालुक्याला वरदान ठरलेल्या ८.५३ टीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणात नोव्हेंबर महिन्यात ९६.०६ टक्के म्हणजेच ८.२३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा पाऊस पिछाडीवर असून केवळ ५९७ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अनेकदा ब्रेक घेतला असून सरासरी गाठलीच नाही.
संबंधित बातम्या :
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरील बाजूस असणाऱ्या आरळा, भामा नदी बरोबरच ओढे, नाले परतीच्या पावसाने खळाळून वाहत असतात आणि धरणात पाण्याची काहीशी आवक होत असते. परंतु यावर्षी मात्र परतीच्या पावसाने दडी मारल्याने ओढे, नाले कोरडे पडले असून धरणात येणारी पाण्याची आवक थंडावली आहे. धरणाच्या बॅक वॉटरवरील जमिनी कोरड्याठाक पडल्या असून जमिनीची भुक भागली नाही. यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पहाता रब्बी व उन्हाळी हंगामात धरणातील पाणी पाहून आवर्तन सोडावे लागणार आहे; अन्यथा पाणी खाली सोडल्यास धरणाच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांत व बॅक वॉटरवरील गावांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावर्षीची पाणीपातळी
– धरणातील पाणीसाठा : ९६.०६ टक्के
– धरणातील पाणीपातळी : ६४९.०५ मीटर
– एकूण पाणीसाठा : २३३.२४ दशलक्ष घनमीटर
– उपयुक्त पाणीसाठा : २०६.०५ दशलक्ष घनमीटर
आजच्या दिवशी गतवर्षीची स्थिती
– धरणातील पाणीसाठा : १०० टक्के
– पाणी पातळी : ६४९. ५३ मीटर
– उपलब्ध पाणीसाठा : २४१.६९ दशलक्ष घनमीटर
– उपयुक्त पाणीसाठा : २१४.५० दशलक्ष घनमीटर
गतवर्षीच्या तुलनेत ४ टक्के साठा कमी
मागील वर्षी याच तारखेला १०६४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अर्धा पाऊस कमी झाला आहे. धरणात १०० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेने ४ टक्के पाणीसाठा कमी शिल्लक आहे.