मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार; ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषण करणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार; ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषण करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी आज (दि.१४) छत्रपती संभाजीनगर येथे केली. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण दिले असले तरी सगेसोयरे अधिसूचना अद्याप अंतिम झालेली नाही.

मराठा आंदोलनातील ठळक मुद्दे

  • मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी गेले कित्येक महिने आंदोलन केले.
  • आंतरवाली सराटी येथून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली होती.
  • ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी जरांगेंनी केली होती.
  • जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील असंख्य मराठा बांधव एकवटला.
  • आंदोलनामुळे राज्यसरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण दिले.

८ जूनला नारायण गड येथे विराट सभा

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले की, सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा फायदा मराठ्यांना झाला नाही. समाजातील मुलांचे वाटोळे सुरूच आहे. यामुळे अंतरवाली सराटी येथे ४ जून पासून उपोषणाला बसणार आहे. जरांगे पुढे म्हणाले, ८ जूनला नारायण गड येथे मराठा समाजाची विराट सभा होणार आहे. त्या अनुषंगाने सभास्थळाची पाहणी करायला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात कधी आले नव्हते, मात्र आता ते गोधड्या घेऊन झोपायलाच इथे आहेत. यातूनच मराठा समाजाची ताकद दिसून येते, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींना ही वेळ फक्त त्यांच्या पक्षातील काही नेत्यांमुळे आली आहे, असा टोलाही जरांगे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लगावला.

राज्य सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी करतानाच ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडतील, त्यांच्या सगेसोयर्‍यांनाही कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. ही मागणी घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर वाशी येथे २६ जानेवारीला या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. राज्य सरकारने जरांगे यांची दुसरी मागणी मान्य करत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयर्‍यांनाही कुणबी दाखले देण्याविषयी काढण्यात येणार्‍या अधिसूचनेचा मसुदा सोपविण्यात आला. ही मागणी मान्य झाल्यावर जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण संपल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर ही अधिसूचना अंतिम झाली नसल्याने जरांगे यांनी राज्य सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news