

रायगड : भारतातील लोकशाही व्यवस्था पद्धती जगभरातील विविध देशात नावाजलेली आहे. सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया याचा अभ्यास करण्याकरीता बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तान या चार देशाच्या निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी सध्या भारतात आले आहेत. त्यांच्या या अभ्यासाकरीता रायगड लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. गेले चार दिवस हे वरिष्ठ अधिकारी रायगड लोकसभा मतदार संघात फिरुन या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करीत आहेत. आज मतदानाच्या दिवशी रायगडमधील विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांचा मतदानाचा उत्साह पाहून हे सर्व परदेशी प्रतिनिधी हरखूनच गेल्याचे पाहायला मिळाले.
परदेशातून आलेल्या या प्रतिनिधींमध्ये बांग्लादेश निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी महंमद मोनिरुझ्झमन टी आणि जी एम शाहताब उद्दीन, झाकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन, श्रीलंका देशाच्या निवडणूक आयोगाच्या संचालक सिलया हिलक्का पासिलीना, झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि झिम्बाबे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सिम्बराशे तोंगाई यांचा समावेश आहे. हे सर्व प्रतिनिधी आपापल्या देशातील उच्च पदस्थ अधिकारी असतानाही भारतात लोकशाही व्यवस्थेचा अगदी विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन अभ्यास करताना पाहून भारतीय अधिकारी देखील अचंबित झालेले पहायला मिळाले.
बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तान च्या या प्रतिनिधींच्या रायगड जिल्ह्यातील आगमनाच्या दिवशी त्यांचे अलिबाग येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि रायगडचे जिल्हाधिकारी या भूमिकेतून किशन जावळे यांनी परदेशी प्रतिनिधींच्या मंडळाला मतदानाच्या प्रक्रियेबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
कायदा सुव्यवस्थेच्या बाबतची संपूर्ण माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीवकुमार झा, केंद्रीय खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी देखील त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची परिपूर्ण माहिती या प्रतिनिधी मंडळाला करुन दिली. मंगळवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी भेटी देऊन भाषादुभाषकांच्या मदतीने त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. भारतातील जनसामान्यांच्या लोकशाही व्यवस्थेबाबतच्या भावना जाणून घेतल्या.
हेही वाचा –