Sanjay Raut | 4 जून नंतर विरोधकांना फिरणेही मुश्किल होईल : संजय राऊत यांची टीका | पुढारी

Sanjay Raut | 4 जून नंतर विरोधकांना फिरणेही मुश्किल होईल : संजय राऊत यांची टीका

जळगाव- शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बेईमानांना स्थान नाही. यांच्यासारख्या गद्दारांचा वध करावा लागेल व तो मतदान रुपी मतपेटीतून जनता करेल. 4 जून नंतर यांना फिरणेही मुश्किल होईल अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी, खडसेंचा विषय हा जुना झालेला आहे. नवीन काही असेल तर विचारा. तसेही पाच लाखांच्या फरकाने आमच्या उमेदवाराचा विजय होणार आहे असा विश्वास पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसेंवर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खडसे हा विषय जुना झालेला आहे व ते तुम्हालाही माहिती आहे की काय आहे. त्यामुळे नवीन काहीतरी विचारा. पाच लाखांच्या फरकाने दोनही ठिकाणे आमचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राऊतांची भाजपवर टीका

भाजप हा चोरांचा पक्ष आहे. पान टपरी वाल्याला बाळासाहेबांनी आमदार व मंत्री केले. त्याला पुन्हा टपरीवर बसवायची वेळ आणायची आहे, असा निशाणा त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर साधला. जळगाव मतदार संघातील निष्ठावंतांची ताकद दाखवून द्यायची आहे. 400 पार म्हणतात, पण होईल का असा उल्लेख त्यांनी केला. मोदींना व अमित शहा यांना मुंबई गुजरातला पळवून न्यायची आहे, म्हणूनच त्यांनी शिवसेना फोडली. यापुढे देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. मग या खोके वाल्यांचा शांतपणे हिशोब करू. तुमचीच गॅरंटी नाही, अन् तुम्ही गॅरंटी देत आहे. महाराष्ट्रात बेईमानी व गद्दारीला स्थान नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात खंडोजी खोपडेंचे हात कलम केले होते. त्याचप्रमाणे मतदार यांचा मतपेटीतून वध करतील व चार जून नंतर यांना फिरणेही मुश्किल होईल अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा –

Back to top button