Dhule Lok Sabha : धुळे लोकसभेची जागा कॉंग्रेसला : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती | पुढारी

Dhule Lok Sabha : धुळे लोकसभेची जागा कॉंग्रेसला : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने धुळ्यात स्त्री शक्ती एकवटणार आहे. महिला मेळाव्याच्या माध्यमातून देशातील महिलांना न्यायाची हमी खा. राहूल गांधी देतील म्हणून धुळे आणि नंदुरबार जिल्हयातील जनतेच्या दृष्टीने काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महत्वाची असून कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आज केले. दरम्यान धुळे लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळाली असून या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसचे नेते चोरणारे आत काँग्रेसच्या घोषणाही चोरायला लागले असल्याचा हल्लाबोल यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांनी केला.

खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे दि. 12 व 13 मार्च रोजी धुळे जिल्हयात आगमन होत आहे. महाराष्ट्रात येणार्‍या भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्याचा मान धुळे नंदुरबार जिल्ह्याला मिळाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हयात खा.राहूल गांधी यांचे स्वागत केले जाणार आहे. त्याअनुषंगाने यात्रेच्या नियोजनासाठी व आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे धुळे जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत आ.कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताबाबत सूचना केल्या. भारत जोडो यात्रेत खा. राहूल गांधी यांचे  रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत करावे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरातील काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांना स्वागतासाठी विशिष्ट जागा ठरवून देण्यात यावी. त्यासाठी यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करावी. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने त्या राज्यातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस की गॅरंटी म्हणून प्रचार केला होता. त्या गॅरंटी काँग्रेसने पूर्ण केल्या. मात्र भाजपाने ही घोषणा चोरून मोदी की गॅरंटी असा प्रचार सुरु केला आहे. भाजपात नेतेही काँग्रेस आणि इतर पक्षातून चोरून आणले आहेत. आता ते घोषणाही चोरायला लागले आहेत असा हल्लाबोल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की, महिलांना न्याय मिळावा, सक्षमीकरण व्हावे, महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी खा. राहूल गांधी लढत आहेत. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महिला मेळावा घेवून धुळ्यातून देशातील महिलांना न्यायाची आणि सुरक्षेची हमी खा.गांधी देणार आहेत. त्यामुळे धुळ्यातील ही यात्रा महत्वाची आहे. देशातील मोदी सरकार हे बोगस गॅरंटी देत आहेत. देशातील भाजपा ही मोदी परीवार झाली त्यामुळे काँग्रेसमुक्तच्या वल्गना करणारी भाजपाच आता भाजपामुक्त झाली आहे. न्याय हा शब्द शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. मात्र आज भाजपा सरकार शेतकर्‍यांवर अन्याय करीत आहे. देशातील शेतकरी सुखी नाही. महिला सुरक्षित नाहीत, जाती जातीत-समाजासमाजात भांडणे लावण्याचे काम भाजपा करीत आहे. मराठा-ओबीसी-धनगर-मुस्लिम-आदिवासी अशी भांडणे भाजपा लावत असून आरक्षण संपविण्याचे काम भाजपा करीत आहे. स्वातंत्र्याची दुसरी लढाई खा. राहूल गांधी लढत आहेत. संविधान वाचविण्याचे हे युध्द आहे. देशात इंडीया आघाडीचे सरकार येणार असून जनतेच्या कल्याणाचे निर्णय इंडीया आघाडी घेईल. कारण खा. राहूल गांधी दिलेला शब्द पूर्ण करतात असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांची सदिच्छा भेट

धुळे दौर्‍यावर आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री  रोहिदास पाटील यांची आवर्जून सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या चर्चा केल्याने खर्‍या अर्थाने प्रेरणा व उर्जा मिळत असल्याची प्रतिक्रीया पटोले यांनी व्यक्त केली

बैठकित प्रास्ताविक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले. भारत जोडो न्याय यात्रा नियोजन बैठकिला माजी खा.बापू चौरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, रमेश श्रीखंडे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, बाजार समितीचे संचालक गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, रणजित पावरा, ज्येष्ठ नेते महेश घुगे, मालेगाव काँग्रेस अध्यक्ष एजाज बेग, पंढरीनाथ पाटील, बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, संचालक एन.डी.पाटील, मुझफ्फर हुसैन, साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, धिरज अहिरे, राजेंद्र देवरे,माजी संचालक प्रकाश पाटील, इंटक अध्यक्ष प्रमोद सिसोदे, सेवा दल अध्यक्ष अलोक रघुवंशी, संतोष राजपूत,माजी संचालक राजेंद्र भदाणे,प्रदिप देसले,सोमनाथ पाटील, के.डी.पाटील, हसण पठाण, अरुण पाटील, शिवाजी अहिरे,दिनकर पाटील, बापू खैरनार, नंदु खैरनार, राजेंद्र खैरनार, ज्येष्ठ नेते मुकूंद कोळवले, किसान काँग्रेसचे शाम भामरे,दिपक गवळे,किरण नगराळे,राजीव पाटील,हर्षल साळुंके, हरीष पाटील, सौ.अर्चना पाटील,वानुबाई शिरसाठ,छायाताई पाटील, भावना गिरासे, हिरामण पाटील आदी उपस्थित होते. बैठकिचे सुत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button