Manoj Jarange-Patil : सरकारने भानावर यावे, हातात आणखी दोन दिवस : मनोज जरांगे-पाटील यांचा निर्वाणीचा इशारा | पुढारी

Manoj Jarange-Patil : सरकारने भानावर यावे, हातात आणखी दोन दिवस : मनोज जरांगे-पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

श्रीपाद कुलकर्णी

 सेलू :  देव जरी आडवा आला तरी आरक्षण अडवू शकत नाही. एकाने नाही, लाखांच्या संख्येने अटक करून घेऊ. (Maratha Reservation ) आम्ही आता मागे हटणार नाही. शांततेत आंदोलन सुरु असताना सरकारने हल्ला केला. अटक करायची खुमखुमी आहे. करायची तर सगळ्यांना अटक करा. तुम्ही कशासाठी नोटिसा पाठवत आहात? आम्ही नोटिसांना घाबरणारे नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सभेत व्यक्त केले. सेलू येथील नूतन महाविद्यालय मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते आज (दि. २२) बोलत होते. (Manoj Jarange-Patil)

संबंधित बातम्या – 

जरांगे-पाटील म्हणाले, सरकारने आता भानावर यावं. आता सरकारने तोडगा काढावा, इतर भानगडीत पडू नये. सरकारने मराठा आरक्षण गांभीर्याने घ्यावे, नाही तर जड जाईल. आपल्या लेकरांसाठी संघर्ष सुरु आहे. आम्हाला मुंबई बघायची आहे, सरकारला काही अडचण आहे का? आम्ही कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागतोय. ही सभा नाही, मराठी बांधवांच्या वेदना आहेत. मराठा आरक्षणासाठी २०० हून अधिक बलिदान झाले. आरक्षण कसं देत नाहीत बघतोच. चुलता, पुतण्या सोयरा होऊ शकतो काय? असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला. Manoj Jarange-Patil

उपोषण ज्या ४ शब्दांपासून सुटलं, ते शब्द पाळा. शिष्टमंडळाला म्हटलं, तुमचं आमचं जमायचं नाही. मी मराठा बांधवांच्या जीवावर लढतोय. सरकारच्या हातात अजुनही २ दिवस बाकी आहेत. मराठा बांधवांची लढाई आथा अंतिम टप्प्यात आलीय. सरकारने नोटिसांच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसात सरकार मार्ग काढेल अशी आशा आहे. मी जीवाची बाजी लावून बसलोय. मी मरणाला घाबरत नाही. पुरुषांनी पुरुषांची जनजागृती करावी. जातीपेक्षा मोठं काहीचं नाही.

दिवसांचे कडक ऊन असो, किंवा रात्रीची कडाक्याची थंडी असो, मराठा समाजातील लहान, थोर, वयोवृद्ध त्रास सहन करून, केवळ आरक्षण मिळावे, म्हणून सभेसाठी येत आहेत. ही लाट आहे. साधीसुधी लाट नाही. सरकारच्या नोटीसला घाबरून लाट मागे हटणार नाही, त्यामुळे सरकारने आता तरी भानावर यावे आणि दोन दिवसांत आरक्षण द्यावे, असा गंभीर इशारा मनोज जरांगे – पाटील यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, मराठा समाजाने ही लढाई ८० टक्के जिंकलेली आहे. त्यामूळे बेसावध राहू नका, अशी संधी पुन्हा येणार नाही. हीच वेळ आहे. असे म्हणत सर्व समाजाने एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. आंतरवली सराटीत पोरांच्या छातीवर गोळ्या घातल्या, आमची काय चूक होती ? आणि आज देखील सरकार नोटीस देवून पुन्हा तोच प्रयोग करत आहे. त्यामुळे यापुढे असे प्रयोग केले, तर सरकारला राज्यात फिरणे मुश्कील होईल, असा इशारा जरांगे – पाटील यांनी दिला.

Manoj Jarange-Patil एकही नेता पाठीशी नाही

मागील ७५ वर्षात मराठा समाजाच्या पोरांनी पोस्टर चिटकविण्याचे काम केले. मात्र, आज एकही मोठा नेता मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. त्यामुळे सावध राहा, पाठीशी कोणीच नाही. ज्याला मोठे केले, तोच म्हणतो मी तुम्हाला आरक्षण देवू देणार नाही. यापुढे जातीपेक्षा नेत्याला मोठे मानू नका. कारण जात व पोरं संकटात सापडलेली आहेत. आपल्याला लेकरांना मोठे करायचे आहे. मी मरायला देखील घाबरणार नाही. मात्र, त्यासाठी आपल्या साथीची गरज आहे.

तोपर्यंत घरी जाणार नाही

मागील चार महिन्यांपासून मी घराचा उंबरठा ओलांडला नाही. हा शेवटचा लढा आहे. पोरांसाठी तो जिंकायचा आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही. सरकारने मला शत्रू मानायला सुरूवात केली आहे. तरी देखील मी घाबरत नाही. सरकारला मानत देखील नाही. मराठा समाजाच्या पोरांसाठी व जातीसाठी मी मागे हटणार नाही, असेही जरांगे- पाटील यांनी स्पष्ट केले.

घोषणांनी परिसर दूमदूमला

यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी बोलण्याचे जरांगे पाटील यांनी टाळले. ते म्हणाले की सरकारच्या समितीने मला विनंती केली की, भुजबळ तुमच्या बद्दल काही बोलणार नाहीत, तुम्ही देखील बोलू नका. त्यामुळे ते बोलेपर्यंत त्यांच्याविषयी मी काहीच बोलणार नाही. जर त्यांनी आरक्षणाला विरोध केला, तर बोलल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange-Patil चोख पोलीस बंदोबस्त

सभेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हाळ यांच्यासह पाच पोलीस निरीक्षक, २५ अधिकारी, २५० कर्मचारी व १०० होमगार्ड यांनी चोख सुरक्षा बजावली. आयोजकांनी शेकडो स्वयंसेवकांमार्फत बैठकीची व्यवस्था केली होती. नागरिकांची नाष्टा व पाण्याची व्यवस्था, सभास्थळासह शहरातील अनेक भागांत करण्यात आली होती.

Back to top button