‘फोडाफोडीत लक्ष देणार्‍या केंद्राचा व्यापारी धोरणांशी संवाद नाही’ : शरद पवार

‘फोडाफोडीत लक्ष देणार्‍या केंद्राचा व्यापारी धोरणांशी संवाद नाही’ : शरद पवार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  फोडाफोडीत लक्ष देणारे केंद्र सरकार देशातील व्यापारी धोरणांशी मात्र संवाद करत नाही. देशातील उत्पादक, शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा पंतप्रधान, अर्थमंत्री, कृषिमंत्री यांचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, या शब्दात ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. बारामती मर्चंट असोसिएशनकडून प्रथेप्रमाणे दिवाळी पाडव्याचा मेळावा पार पडला. या वेळी ते बोलत होते. वालचंद संचेती, राजेंद्र गुगळे, संभाजी किर्वे, जवाहर शाह-वाघोलीकर, सदाशिव सातव, सुशील सोमाणी, पौणिमा तावरे, सचिन सातव, सुनील पवार आदींची या वेळी उपस्थिती होती.

संबंधित बातम्या :

खा. पवार म्हणाले, यूपीएच्या काळात व्यापारी व सहकार क्षेत्रातील अनेक लोकहिताचे कायदे केले गेले. शेतकरी आणि व्यापारी यांच्या विचाराचे सूत्र घेऊन काम केल्यास बाजारपेठेला वेगळे स्थान निर्माण केले. व्यापार सुलभ पद्धतीने झाला पाहिजे आणि चार पैसे शेतकरी, व्यापारी यांच्या पदरात पडले पाहिजेत, अशी भूमिका घेऊन काम केले गेले. मात्र, आता केंद्र सरकारचा या घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सामंजस्यपणाचा आहे, असे दिसत नाही.

पवार म्हणाले की, आजचे अर्थमंत्री आणि व्यावसायिक घटक यांच्यात कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. हल्लीच्या केंद्रीय अर्थमंत्री कधी भेटल्या नाहीत. काही चर्चा नाही, सुसवांद नाही. व्यापार आणि त्यांचे इतर घटक यांना विचारात घेतले जात नाही. पंतप्रधान हेदेखील यात लक्ष देत नाहीत. पाच राज्यांत निवडणुका चालू आहेत. त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान काय बोलतात हे आपण पाहिले. देशाचे मूलभूत प्रश्न सुटू शकत नाहीत. त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आणि त्याची किंमत प्रत्येकाला द्यावी लागेल, असे पवार म्हणाले. सहकार मंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप पंतप्रधान करत नाहीत. एका अर्थी ते चांगले आहे. परंतु काही प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी हस्तक्षेप करायला हवा, तसे होताना दिसत नाही, असेही पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news