मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला; जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणास बसणार | पुढारी

मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला; जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणास बसणार

वडिगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मयाराठा समाजाला सरसगट कुणबी आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज मंगळवार २४ ऑक्टोबरला संपत आहे. मात्र, अजुनही सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. आजचा शेवटचा दिवस हा सरकार साठी असणार आहे. आज आरक्षण जाहीर केले नाहीतर पुन्हा २५ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची भुमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे.यावेळी पाणी व उपचार घेणार नसल्याने हे उपोषण कडक स्वरूपाचे असणार आहे,तसेच यापुढे सरकारला वेळ वाढवून दिला जाणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की,आज मुख्यमंत्री निर्णय घेतील,ते शब्दाला जागणारे आहेत. त्यांनी निर्णय घेतला नाही तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार. मग नेत्यांनी आमच्या गावात यायच नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणारे नसणार असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आज दिवसभर आणि रात्रीपर्यंत सरकारकडे वेळ आहे, त्यांना जे काही करता येईल ते त्यांनी करावं. त्यानंतर, त्यांच्याकडे वेळ नाही, पुन्हा आमच्या दारात यायचं नाही, यायचं तर आरक्षणच घेऊन यायचं, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

यापुढे सरकारला एक तास ही वाढवून मिळणार नाही, तो विषय उद्यापासून संपला, आजचा दिवस आणि रात्री एवढा वेळ त्यांचा आहे. सरकार आरक्षण देणार असेल तर आम्ही त्यांच्याशी बोलू, ते आरक्षण देणार नसतील तर त्यांना कश्याला बोलायचे असे ही जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे म्हणून समाजात त्यांना ओळखल जात. त्यामुळे, शब्दाला जागून मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आरक्षण दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पदापेक्षा शब्दाला जास्त किंमत द्यावी असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्याला भेट देवून पाठिंबा दिला.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी चौंडी येथील मेळाव्याला उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला.येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं दर्शन त्यांनी घेतले.यावेळी ते म्हणाले की, आरक्षणाच्या संदर्भात सरकार मराठा आणि धनगर या दोन्ही समाजाला फसवत असून आपल्या लढ्याला यश मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही असे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हा लढा सामान्य धनगर आणि सामान्य मराठा बांधवांचा आहे. तुम्ही आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे तुमच्या पाठीशी उभे राहणे हे आमचेही कर्तव्य आहे. सामान्य मराठा घराघरातून रस्त्यावर उतरला तसाच धनगर बांधवानेही स्वत:चे मतभेद सोडून एकीने या लढ्यात सहभागी व्हावे त्याशिवाय सरकार झुकणार नाही.भविष्यात तुम्ही आम्ही एकत्र येवू. जर एकजूट झाली नाही तर मराठा असो वा धनगर कुणालाही न्याय मिळणार नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button