लखनौ : पुढारी ऑनलाईन; उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ६ संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली होती. (Uttar Pradesh Rape)
या मुलींचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मुलींचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. अपहरणाचा हा प्रकार दिवसाढवळ्या घडला होता. त्यानंतर बुधवारी या मुलींचे मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत मिळून आले. या प्रकणानंतर ग्रामस्थ आणि पीडितेच्या नातेवाईकांनी गावात निदर्शने केली होती.
या प्रकरणात पोलिसांनी त्याच गावातील छोटू निगम तसेच शेजारील गावातील जुनैद, सोहेल, हफिजुल रहेमान, करिमुद्दीन आणि अदिल या तरुणांना अटक केली आहे, अशी माहिती लखीमपूर खेरीचे पोलिस प्रमुख संजीव निगम यांनी दिली. या मुलींचे जुनैद आणि सोहेल या तरुणांशी प्रेमसंबंध होते, तर सोहेल आणि हफिजुल या तरुणांनी या मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून केला. या गुन्ह्यात छोटू निगमने याने संशयितांना मदत केली. तर करिमुद्दीन आणि अदिल यांनी मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. या गुन्ह्यात पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिकच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे, असे पोलिसांनी ट्विट केले आहे.
nbsp;
संशयितांवर भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३२३, ४५२, ३७६ आणि POSCO नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
तत्पुर्वी या प्रकरणात विरोधी पक्षाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. प्रियंका गांधी यांनी जाहिराती करून राज्यातील कायदा सुव्यवस्था सुधारत नाही, उत्तर प्रदेशात महिलांविरोधातील गुन्हे वाढत आहेत, अशी टीका केली होती.
हेही वाचा